बुलढाणा: जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव जामोद तालुक्यात रेती माफियानी हैदोस घातला आहे. आजवरच्या काळात रेती वाहक टिप्पर व अन्य वाहनानी अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले आहे.  शुक्रवारी,९ मे रोजी अशाच एका दुर्देवी  अपघातात दोन निष्पाप बालकांचा बळी गेला तर दोघे वृद्ध गंभीर जखमी झाले आहे.

    यामुळे भेंडवळ जवळच्या माऊली फाट्यावर उपस्थित गावकरी, युवकांचा संताप अनावर झाला.  त्यांनी दोघांचे बळी घेणारे रेती वाहक टिप्पर  पेटवून दिला. यामुळे  आग व धुराचे लोट उडत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले. यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला .  जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माऊली फाट्यावर  पोलीस बंदोबस्त वाढवला  आहे. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यावरून आणि खामगाव  येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.  जळगाव जामोद व अन्य ठिकाणच्या पालिकाचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले.

एसडिपीओ’ म्हणतात,परिस्थिती नियंत्रणात

दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ( खामगाव) यांनी  घटना स्थळ वरील स्थिती  नियंत्रणात आणली.  ‘परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे प्रदीप पाटील म्हणाले. या प्रकरणी जळगाव जामोद येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 काय झाले होते?

जळगाव जामोद तालुक्यात अवैघ गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुजोरी वाढली  असल्याचे आज  ९ मे रोजी सकाळी  पुन्हा दिसून आले. भरधाव वेगातील व वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या एका टिप्परने दुचकीला पाठीमागून धडक दिली. यात दोन लहान बालक ठार झाले. तसेच त्यांचे  आजी आजोबा गंभीर जखमी झाले.जळगाव तालुक्यातील  पळशी सुपो येथून  प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती-पत्नी आपल्या दोन नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत होते. भेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात  दुचाकीवरील पार्थ चोपडे (६ वर्षे रा. राजापेठ, अमरावती) आणि युवराज मोहन भागवत (५ वर्षे रा. बडनेरा)  यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले . या घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत टिप्परला आग लावली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.  परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 वाळू माफिया सुसाट

जळगाव जामोद भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतुक होत आहे. याकडे महसुल प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून  दुर्लक्ष होत असल्याची ओरड स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे. वाळू वाहतूक करणारे टिप्पर, टॅक्टर व अन्य वाहन मनमानी पध्दतीने भरधाव वाहने चालवून नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.