नागपूर : मध्यप्रदेशातून आईवडिलांसह कामाच्या शोधात नागपुरात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींनी दोन युवकांसह पलायन केले. चौघांनी कर्नाटकमध्ये पळून जाऊन संसार थाटला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कपीलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन्ही युवकांचे समूपदेशन करुन पालकांच्या ताब्यात दिले.  गेल्या ११ फेब्रुवारी २०२५ चे सायंकाळी कोराडी हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीची १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी व तिची १६ वर्षाची मैत्रीण या दोघीही बाजार आणण्याकरिता कपीलनगर हद्दीतील खसाळा बाजारात गेल्या होत्या. रात्र झाली तरी त्या घरी परत आल्या नाही. त्यांचा शोध घेतला असता सापडल्या नाही. त्यांना कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी माहितीवरून तांत्रिक तपास केला. शहरातील मुख्य मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासल्या वर त्या बसने बाहेरगावी गेल्याचे निदर्शनास आले. त्यांचा शोध घेतला असता सुरवातीला त्या हैदराबाद आणि तेथून त्या बंगळुरू येथे गेल्याचे निदर्शनास आले.

तपास पथकाचे अधिकारी त्यांना बंगळुरू येथून ताब्यात घेण्यासाठी जाणारच होते तर त्यांना त्या दोन्ही मुली नागपुरला येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर पाळत ठेवून दोन मुली आणि दोन युवकांना ताब्यात घेतले.  त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्या पैसे कमविण्यासाठी बंगळुरूला गेल्याचे समोर आले. त्यांना या कामात त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी  मदत केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्या चौघांचे समुपदेशन केले. दोन्ही मुली व दोन संशयीत मुलांना पुढील कारवाईसाठी कपीलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही संपूर्ण कारवाई महिला पोलीस निरीक्षक ललीता तोडासे यांनी सहायक फौजदार गजेंद्रसिंग ठाकूर, पोलीस हवालदार राम निरगुडवार, पोलीस अंमलदार ऋषीकेश डुमरे, विलास चिंचुलकर, नरेश शिंगणे, महिला पोलीस अंमलदार अश्विनी खोडपेवार व पल्लवी वंजारी यांनी पार पाडली.