विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे-फडणवीस सरकारची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी याच मुद्द्यावर सरकार घेरलं. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते सर्व शिंदे गटातील असल्याने चर्चांना उधाण आलंय. यावर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे. ते गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, "सर्व भ्रष्टाचाराचे आरोप केवळ शिंदे गटाच्याच मंत्र्यांवरच का होत आहेत हा विचार शिंदे गटातील मंत्र्यांनीच केला पाहिजे. ही प्रकरणं नेमकी कोठून बाहेर येत आहेत आणि कशी बाहेर येत आहेत यावर शिंदे गटाने विचार करावा. हा शोध त्यांनीच घ्यावा." "…तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला" "ही भ्रष्टाचाराची प्रकरणं माझ्या सरकारच्या काळात झाले. मात्र, याचा अर्थ माझा त्याला पाठिंबा होता, असं नाही. जेव्हा आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. तो मंत्री तेव्हा माझ्या शिवसेनेबरोबर होता. आता कुठे आहेत माहिती नाही. आताही त्यांचं प्रकरण बाहेर आलं आहे. आता एकएक प्रकरण बाहेर येत आहे," असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. हेही वाचा : “नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, “आधी…” "शिंदे गटाने भाजपा आधार देतेय की गाडत आहे हा विचार करावा" "आता शिंदे गटाच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाने भाजपा आधार देतेय की गाडत आहे हा विचार करावा," असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. “सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला” अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “दोन आठवड्यांपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय हे दिसतंय. अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेला काय दिलं, हा प्रश्न राहणार आहे. त्याचं उत्तर या सगळ्यांनी दिलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. हेही वाचा : “बॉम्ब बरेच, वातीही काढल्यात, आता…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा “महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशन काळामध्ये रोज एकेक मंत्र्याच्या घोटाळ्यांविषयी आरोप झालेत, चर्चा झाली आहे. इतिहास पाहिला तर आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन त्या त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. यावेळी तसं होईल असं वाटत नाही. पण गेल्या सहा महिन्यांत हे सरकार नेमकं करतंय काय, हे लोकांच्या समोर आलंय. एनआयटीपासून घोटाळ्यांची सुरुवात झाली. मग सत्तार, उदय सामंत या सगळ्यांच्या घोटाळ्यांबाबत सरकार काय करणार? की आरोप झाले त्यांना क्लीनचिट आणि आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं हेच या सरकारचं धोरण आहे का? हे सरकारने स्पष्ट करायला हवं”, असं ते म्हणाले.