नागपूर : अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करणे, विशिष्ट गटाला झुकते माप देणे, अशा उद्योगांमुळे कायम चर्चेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पीएच.डी. छळ प्रकरणात सदस्यांचा रोष टाळण्यासाठी कुठलीही चर्चा न होऊ देता अगदी दोनच मिनिटात विधिसभा गुंडाळली. या दडपशाही धोरणाविरोधात आक्रमक झालेल्या सदस्यांनी कुलगुरूंविरोधात घोषणा देत आंदोलन केले. विशेष म्हणजे, कुलगुरूंनी विद्यापीठातील लोकशाही व्यवस्थेची हत्या केली असा आरोप सदस्यांनी केला. आगामी काळात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुका होणार आहेत. ही विधिसभेच्या कार्यकाळातील शेवटची बैठक होती. त्यातच पीएच.डी.साठी विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आल्याच्या तक्रारीमुळे शैक्षणिक वर्तुळातील वातावरण तापले आहे. विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वी अनेकदा अडचणीत आणणाऱ्या ‘एमकेसीएल’ या संस्थेला सर्वाचा विरोध असतानाही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठात कामाची संधी. या दोन्ही प्रकरणांवरून विधिसभेचे सदस्य सोमवारच्या बैठकीत कुलगुरूंना घेरणार हे निश्चित होते. त्यामुळे कुलगुरूंनी सावध पवित्रा घेत दोन मिनिटात बैठक गुंडाळली, असा आरोप सदस्यांनी केला आहे. कुलगुरूंच्या या दडपशाही धोरणाविरोधात संतप्त सदस्यांनी सुरुवातीला कुलसचिवांना घेराव घालत बैठक घेण्याची मागणी केली. यानंतर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. शतकोत्तर वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळातून कुलगुरूंच्या दडपशाहीचा निषेध होत आहे. कुलगुरूंविरोधातील या आंदोलनात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे, अॅड. मनमोहन वाजपेयी, डॉ. नितीन कोंगरे, डॉ. आर.जी. भोयर, प्रवीण उदापुरे, डॉ. अजित जाचक, डॉ. स्मिता वंजारी, डॉ. उर्मिला डबीर, शिवानी दाणी यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते. कुलगुरू, प्र-कुलगुरूंची भूमिका संशयास्पद ११ मार्चच्या बैठकीत अनेक विषयांवरील चर्चा अर्धवट राहिल्यामुळे सोमवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. असे असतानाही कुलगुरूंनी विषय पत्रिकेवरील कुठल्याही प्रस्तावावर चर्चाच होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांना बैठकीला सामोरे जायचे नव्हते, हे स्पष्ट होते. विधिसभेची बैठक असतानाही आपल्याला ११ वाजता एका विभागातील कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे, असे सांगत कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी बैठक गुंडाळली. सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून ते प्रशासकीय भवनात थांबले नाहीत, असा आरोप सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी केला. असा साधला डाव.. सोमवारी आयोजित विधिसभेला अॅड. मनमोहन वाजपेयी, डॉ. सातपुते हे दोन सदस्य वेळेत पोहोचले. सभा सुरू होताच डॉ. सातपुते यांनी एक प्रस्ताव मांडला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी लगेच हा प्रस्ताव मंजूर केला आणि लगेच राष्ट्रगीत घेऊन बैठक विसर्जित करण्यात आली. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीतील चर्चेला डॉ. चिमनकर यांच्या प्रस्तावापासून सुरुवात होणार होती. मात्र, कुलगुरूंनी कुठलीही चर्चा होऊ न देता बैठकच गुंडाळली. ४ एप्रिलला बैठकीचे आश्वासन सदस्यांच्या दिवसभराच्या आंदोलनाची दखल घेत अखेर कुलगुरू डॉ. चौधरी दुपारी ३ वाजता कार्यालयात आले. त्यांना सदस्यांनी घेराव घालत सभा विसर्जित करण्याची कारणे विचारली. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. या घमासान चर्चेनंतर कुलगुरूंनी सोमवारची बैठक स्थगित केल्याचे जाहीर करून पुन्हा ४ एप्रिलला नव्याने बैठक घेण्याचे आश्वासन दिले.