लोकसत्ता टीम वर्धा: बुधवारी सायंकाळी व आज सकाळपासून पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. मात्र, आजपासून पुढे तीन दिवस विजेचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारपीट, मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. वीज पडण्याची संभाव्य ठिकाणं शेतकऱ्यांनी माहीत करून घ्यावी. त्यासाठी 'दामिनी- लाईटनिंग अलर्ट' हे मोबाइल अॅप उपयोगात आणावे. त्यात उपलब्ध माहितीचा उपयोग विजेपासून बचाव करण्यासाठी होवू शकतो. जनावरांना गोठ्यातच ठेवावे, गाय व अन्य पाळीव पशूंना झाडाखाली बांधून ठेवू नये, शेतात काम करताना दोन व्यक्तीत अधिकाधिक अंतर असावे, मेघगर्जनेची चाहूल लागताच झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी थांबावे, शेतातील कापणी झालेले पीक उंच ठिकाणी जमा करून त्यावर ताडपत्री झाकावी, पावसाशी संपर्क टाळावा, परिपक्व अवस्थेतील गहू, कापूस, चना आदी पिकांची काढणी व मळणीची कामे तत्काळ व पुरेसे मनुष्यबळ नसल्यास सामूहिक हारवेस्टरने आटोपावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.