वेबचर्चा संवाद व मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम नागपूर : नक्षलवाद्यांचा विरोध असताना जीव धोक्यात घालून १८-१८ किलोमीटर चालत मतदानाचा अधिकार बजावणारे नक्षलग्रस्त भागातील नागरिक हेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पाईक आहेत, त्यांच्यापासून शहरी भागातील मतदारांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन नक्षलवाद प्रभावित भागाचे अभ्यासक व लोकसत्ताचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, महा आयटी, माहिती केंद्राच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘वेब चर्चा संवाद’ कार्यक्रमात ‘स्वातंर्त्योत्तर भारत व ग्रामीण भागातील निवडणुकांचे बदलते स्वरूप’, या विषयावर ते बोलत होते. नक्षल भागात विविध निवडणुकांमध्ये आलेले अनुभव कथन करताना गावंडे यांनी नक्षलग्रस्त भागातील मतदार हिमतीने मतदानासाठी कसे पुढे येतात, हे स्पष्ट केले. दुसरीकडे मतदानाच्या दिवशी मतदान न करता सहलीला बाहेर जाणाऱ्या शहरी मतदारांकडेही त्यांनी लक्ष वेधले. गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील मतदार १८ ते २० किलोमीटर पायपीट करत मतदान करतात. त्यांच्यापासून शहरातील मतदारांनी बोध घ्यावा. लोकशाहीत अधिक सुविधा नागरी भागाला मिळाल्या आहेत. मात्र बोटावर शाई लावली तर ते तोडून टाकू, गोळय़ा घालू, अशा धमक्या दिल्यानंतरही कुटुंबकबिल्यासह मतदानासाठी जाणारा आदिवासी बांधव लोकशाही प्रक्रियेमध्ये उजवा ठरतो, असे ते म्हणाले. आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी जीवाचे बलिदान करून लोकशाहीसाठी शहीद झालेल्या नागरिकांची संख्या ग्रामीण नक्षली भागात अधिक आहे. मात्र त्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंतही गावंडे यांनी व्यक्त केली. सुरूवातीला जिल्हाधिकारी विमला आर. यांनी देवेंद्र गावंडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला माहिती संचालक हेमराज बागुल, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर या उपस्थित होते.