शहरातील फुटाळा, गांधीसागर आणि सोनेगाव या ठिकाणांवर गणपती आणि देवी विसर्जन वषार्ंनुवषार्ंपासून करण्यात येत आहे. गेल्या काही वषार्ंपासून कृत्रिम तलावांचा प्रयोग आणि ‘पीओपी’च्या मूर्तीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न होत असला तरीसुद्धा आजदेखील ‘पीओपी’ मूर्तीचा सर्वाधिक भार फुटाळा तलावाला सहन करावा लागत आहे. याच फुटाळा तलावावर यावेळी ‘ग्रीन विजिल’ या पर्यावरणप्रेमी संस्थेमुळे पहिल्यांदा देवी विसर्जनात कृत्रिम तलावांचा प्रयोग घट विसर्जनासाठी करण्यात आला.

गणपती विसर्जनासाठी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर महापालिकेच्यावतीने केले जाणारे व्यवस्थापन देवी विसर्जनात मात्र दिसून येत नाही. पालिका प्रशासनाच्या मते, फुटाळा तलावाव्यतिरिक्त इतर तलावात देवींचे विसर्जन केले जात नाही. प्रत्यक्षात मात्र गांधीसागर, सोनेगाव या तलावात लहान आकाराच्या देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. देवीच्या मूर्ती पाण्यातील प्रदूषणासाठी जेवढय़ा कारणीभूत ठरत नाही, त्याहून तुलनेने अधिक देवीसोबत असलेले घट तलावातील पाण्याच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. घटांमध्ये गौरीसह दिवे असतात आणि विसर्जनानंतर त्या तेलाचा तवंग पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो. देवीच्या मूर्ती मोठय़ा असल्यामुळे कृत्रिम तलावात त्यांचे विसर्जन करता येत नाही हे खरे असले तरीही घट विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थेने अनेकदा केली.

यावर्षी पहिल्यांदा या कृत्रिम तलावाचा प्रयोग घट विसर्जनासाठी फुटाळा तलावावर करण्यात आला. त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळाला. दोन दिवस चाललेल्या देवी विसर्जनात अनेक मंडळांनी स्वत:हून निर्माल्य ‘ग्रीन विजिल’ या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सुपूर्द केले तर कृत्रिम तलावात त्यांनी घट विसर्जन केले. विशेष म्हणजे केंद्रीय खाण योजना आणि डिजाईन संस्थेने (सीएमपीडीआय) फुटाळा तलावातील विसर्जन स्थळावर वाहन नेण्यापूर्वी त्या वाहनातील देवीचा हार, थर्माकोलच्या वस्तू, घट असे संपूर्ण साहित्य स्वत:हून ‘ग्रीन विजिल’च्या सुपूर्द केले. एअरफोर्सच्या मदतीने फुटाळा तलावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. देवी विसर्जनानंतर तलावावरचा हा भार आणखी वाढणार आहे. त्यामुळे देवी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाच्या झालेल्या वापराच्या या प्रयोगानंतर महापालिका तलावाच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणार का, हे येत्या काही दिवसातच कळणार आहे.

दुर्गादेवीसोबत असलेले देवीचे वाहन, असूर आणि असूराचे वाहन, गणपती आणि गणपतीचे वाहन, लक्ष्मी आणि लक्ष्मीचे वाहन अशा किमान दहा मूर्ती तलावात विसर्जित केल्या जातात. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या बरोबरीनेच देवीचे विसर्जन होते. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी असलेले व्यवस्थापन देवी विसर्जनातही महापालिकेने करायला हवे, असे ‘ग्रीन विजिल’चे कौस्तुभ चटर्जी म्हणाले.