नागपूर : जिल्हा परिषदेंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीसाठी विषय पदवीधर शिक्षकांची दीडशे पदे सहा महिन्यांपूर्वीच भरण्यात आली. मात्र, या शिक्षकांना लगेचच केंद्रप्रमुख पदावर तदर्थ पदोन्नतीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्यात आल्यामुळे ७० पदे पुन्हा रिक्त झाली आहेत. केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळवण्याचा शिक्षकांचा अट्टाहास विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ ठरू पाहात आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या काही शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता न करता केवळ प्रशासनाची सोय व्हावी म्हणून सामाजिक शास्त्र संवर्गातील पात्र शिक्षक न मिळाल्यामुळे रिक्त राहिलेल्या २९ जागा भाषा व विज्ञान संवर्गातील शिक्षकांमधून भरण्याच्या हालचाली जि.प. प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी एवढा अट्टाहास का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या गप्पा मारायच्या आणि केवळ प्रशासकीय सोयीच्या बाबी प्राधान्याने करायच्या, अशी जि.प. प्रशासनाची दुटप्पी भूमिका यावरून समोर आली आहे.