जेईई (अॅडव्हान्स) जेईईचा (अॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर होऊन विदर्भातून पहिल्या १०० मध्ये येण्याचा मान हिमांशू भोयर या विद्यार्थ्यांने पटकावला. हिमांशूचा ९७ वा क्रमांक आहे, तर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या समीर पांडे या विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय स्तरावर १०४वा क्रमांक आहे. हर्ष डोल्हारे याचा ८५५ वा क्रमांक आहे. एकूण १०९ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स उत्तीर्ण केल्याचे एका खासगी शिकवणी वर्गाचे म्हणणे आहे. गेल्या २१ मे रोजी ही परीक्षा झाली. त्यातील २.२ लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ हिमांशूच पहिल्या १००मध्ये आला. इतर विद्यार्थ्यांना १००च्यावर गुण आहेत. त्यातील समीर पांडे याने १०४ गुण घेत तो दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे यांनी केला आहे. याशिवाय दुर्गेश अग्रवाल (१२४), अखिलेश गणेशकर (५७७), अमन राय (७१०), अजिंक्य बोकडे (७८४) आणि हर्ष त्रिवेदी (८४३) या विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित आयआयटीजमध्ये प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. एससीमधून अखिलेश गणेशकरचा अखिल भारतीय स्तरावरील क्रमांक ८ आहे. नागपुरातील वेगवेगळ्या खासगी शिकवणी वर्गाच्या दाव्यावरून सुमारे २५० विद्यार्थ्यांचा आयआयटीजमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. ईश्वरी मुल्कलवार बी.आर्क. मध्ये दुसरी जेईई अॅडव्हान्स अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या दोन अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेते. त्यात ईश्वरी मुल्कलवार या विद्यार्थिनीने बी.आर्क. मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे जवळपास २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवले. या सर्वाना भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे म्हणाले.