लोकसत्ता टीम
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतदान सुरू झाले. मात्र, मतदानाचा अत्यल्प प्रतिसाद आहे. दुपारी २ वाजतापर्यंत केवळ १५ ते २० टक्केच मतदान झाल्याची माहिती आहे. अनेक मतदारांचे मतदान केंद्र त्यांच्या रहिवासी पत्ता नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गेल्याने याचा फटका निवडणुकीवर बसत असल्याचे चित्र आहे.
पदवीधरच्या १० जागांकरिता या ५१ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये ६० हजार ३७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहरात सर्वाधिक ३५ मतदान केंद्र असून नागपूर जिल्ह्यामध्ये २२, भंडारा जिल्ह्यामध्ये २१, गोंदिया जिल्ह्यामध्ये ११ तर वर्धा जिल्ह्यात १३ असे एकूण १०२ मतदान केंद्र संलग्नित महाविद्यालयांमध्ये निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा- अमरावती : सुटीच्या दिवशीही संपकर्त्यांचा जिल्हा परिषदेसमोर डेरा; सोमवारी ‘थाली बजाओ आंदोलन’
दुपारी २ वाजतापर्यंत केवळ १५ ते २० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मतदान केंद्रावर आल्यावर आपले मतदान दुसऱ्याच जिल्ह्यात असल्याचे माहिती झाल्याने मतदारांचा हिरमोड होत आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांचे केंद्र नागपूर होते आता त्यांचे केंद्र भंडारा, देवरी, लाखांदूर असे देण्यात आले आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी बसणार आहे.