लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : २० जुलै रोजी नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे दहा हजारांवर घरात पाणी शिरले होते. पावसाच्या या प्रकोपासाठी सिमेंट रस्ते बांधणी कारणीभूत असल्याचा आरोप सार्वत्रिकरित्या केला जात आहे. मानेवाडा-बेसा मार्गावर सिमेट रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे पावसाचे पाणी अडल्याने नागरिकांनी जोड रस्ता तोडून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. त्याचा व्हीडीओ आता व्हायरल झाला.

नागपूरमध्ये शहराच्या विविध भागात सिमेट रस्त्यांची कामे सुरू आहे. काही ठिकाणी एका बाजूचे रस्ते झालेत . दुसऱ्या बाजूचे काम शिल्लक आहे. एक वर्ष ते दीड वर्षापासून अर्धवट काम पडून आहे. पावसाळ्यात अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचते, दुसरीकडचा रस्ता बांधण्यात आल्याने पाणी बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. त्यामुळे जागा मिळेल तेथे पाणी शिरते. रस्त्यालगत घरे असेल तर सर्वप्रमथम पाणी या घरात शिरते. २० जुलै रोजी असाच जोराचा पाऊस नागपूरमध्ये सर्वत्र झााला मानेवाडा ते बेसा हा रस्ता सिमेटचा बांधला जात आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असून दुसऱ्या बाजूने काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेल्या वस्त्यांकडे जाता यावे म्हणून सिमेट रस्त्याला डांबरी रस्त्यांचा जोड देण्यात आला आहे.

आणखी वाचा-वर्धा : मातृत्वाचा सौंदर्यपूर्ण सोहळा! गर्भवती महिलांचा ‘फॅशन शो’मध्ये ‘रॅम्प वॉक’

२० जुलैच्या पावसात मानेवाडा- बेसा रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिक संतापले होते. वस्त्यांमधील रस्त्यावरील पाणी काढायचे कसे असा प्रश्न नागरिकांना होता. जोड रस्ता फोडल्यास वस्त्यांमधील पाणी बाहेर पडेल असे गृहीत धरून बेसा-मानेवाडा मार्गावरील काही नागरिकांनी डांबरी रस्ता तोडून पाण्याला मार्ग करून दिला. दरम्यान या भागातील नागरिकांनी रस्ते बांधणीच्या वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्याबाबत विचारणा केली होती. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यावर पुन्हा ही समस्या निर्माण झाली. त्याचा परिपाक नागरिकांच्या संतापात झाला व त्यामुळे लोकांनी रस्ताच तोडला.

आणखी वाचा-‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वात अमरावतीकर आर्या जाधवची दमदार एन्ट्री

महापालिका आयुक्त अभिजत चौधरी यांनी सुद्धा नागपूरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरण्यासाठी सिमेंट रस्ते कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. रस्त्यालगत नाल्या बांधण्यात आल्या नाही, त्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्गच उरला नाही. यापूर्वी पश्चिम नागपूरमध्ये शंकरनगर भागात नागरिकांनी सिमेट रस्ते बांधण्यास विरोध केला होता. एक तर या रस्त्याचे बांधकाम दीर्घकाळ चालते व वाहतुकीची अडचण होते. याचाही फटका नागरिकांना बसतो. राजकीय आश्रय असल्याने कंत्राटदारावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचेही फावते. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नातेवाईकांनीच सिमेट रस्ते बांधकामाचे कंत्राट दुसऱ्याच्या नावावर घेतले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water enter in the house due to rain in nagpur angry citizens broke the road cwb 76 mrj