चंद्रपूर: कडक उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगामाला सुरूवात होताच वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जंगलाला लागून असलेल्या गावातील लोक पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदू गोळा करण्यासाठी जात असल्याने मागील काही दिवसांमध्ये वाघ व वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे. आज मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या मीना जांभुळकर व विकास जांभुळकर या नवरा बायकोवर वाघाने हल्ला केला. यात बायको मीना जांभूळकर हिचा मृत्यू झाला तर पती विकास जांभूळकर अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील रहिवासी आहेत. जांभूळकर दाम्पत्य आज सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वन परीसरात  तेंदुपत्ता गोळा करण्यास गेले असता, जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने या दाम्पत्यावर हल्ला केला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर पती विकास अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी तथा पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पतीचा शोध घेणे सुरू आहे.