खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांनासाठी वरदान ठरू शकणाऱ्या अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज सिंचन प्रकल्प भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरला आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३०५ कोटी रुपये खर्च झाले, पण कंत्राटदार अर्धवट काम सोडून गेला आणि शासन, प्रशासन हातावर हात ठेवून बसले आणि गेल्या दहा वर्षांपासून प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे. हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे? पूर्णा उपखोऱ्यातील उमा नदीवर बोर्टा येथे उमा बॅरेज हा मध्यम सिंचन प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प खारपाण पट्ट्यातील लोकांसाठी वरदान ठरू शकणार आहे. मूर्तीजापूर तालुक्यातील २१ गावातील एकूण ५५१० हेक्टर क्षेत्राचे यामुळे सिंचनाची सोय होणार होती. परंतु प्रकल्प वर्षानुवर्षे पूर्ण करायचेच नसतात असा समज राजकीय नेते, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचा झालेला दिसतो. याचे उत्तम उदारहण उमा बॅरेज प्रकल्प आहे. ७८.६१ कोटी रुपयांच्या प्रकल्पावर आजवर ३०५ कोटी खर्च झाले. पण कंत्राटदार काम सोडून गेल्याने दहा वर्षांपासून प्रकल्पाचे काम ठप्प आहे. धरण परिसरात सर्व साहित्य भंगार अवस्थेत पडून आहे. बांधकाम स्थळी झाडे-झुडपे वाढली आहेत. हेही वाचा : नवी मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक या प्रकल्पाची ३१ ऑगस्ट २००७ रोजी मूळ किंमत ७८.६१ कोटी होती. ती मार्च २०११ मध्ये वाढून २३७.२३ कोटीवर गेली. मार्च २०२२ अखेर या प्रकल्पावर ३०५.१२ कोटी रुपये खर्च झाले असून आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा ७०७.३६ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प २०१२-१३ मध्ये पूर्ण करायचा होता. त्यासाठी पम्पिंग मशिन, लोखंडी पाईप तसेच इतर बरेच साहित्य खरेदी करण्यात आले. पण, २०१२ ला कंत्राटदार काम सोडून गेला. तत्पूर्वी कंत्राटदाराला पूर्ण रक्कम देण्यात आली होती. सिंचन खात्याने त्यांला काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्याची मनधरणी केली. त्याने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर त्याच्यावर दिवाणी खटला भरला. पण प्रकल्पाचे काम बंद असल्याने त्यावर झालेला शेकडो कोटींचा खर्च व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पात शासन, प्रशासन गंभीर नसल्याचे जनमंचच्या सिंचन शोध यात्रेदरम्यान दिसून येत आहे, असे जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले. प्रकल्पग्रस्त आणि प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी. स्थानिकांना प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती द्यावी तसेच विलंब का होतो आहे. कंत्राटदार का पळून गेला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे.