नागपूर : “एखादा चांगला विषय असेल तर आपण बोलायला पाहिजे. ते राणा दाम्पत्याचे रडगाणे किती दिवस गायचे. खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्जपणा करतच राहणार आहेत,” अशी बोचरी टीका महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. नागपुरात काँग्रेसच्या समाज माध्यम विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवसंकल्प शिबिराच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता यशोमती ठाकूर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांवर शनी अशी टीका केल्याबद्दल विचारले असता त्यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “जो दुसऱ्याचा मान सन्मान करु शकत नाही, तो स्वतःचाही कधीच मान सन्मान करत नसतो. ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या देशात राहतो तिथे तिरंग्याचा सन्मान महत्वाचा आहे.”

“नवनीत राणा यांनी बेशर्मीची हद्द गाठली”

“सगळ्यांनी एकत्र राहावे, सगळ्यांना सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे. निवडून येण्यासाठी एक प्रकारे हा तमाशा काय करायचा, कोणालाही काहीही बोलायचे. नवनीत राणा यांनी बेशर्मीची हद्द गाठली आहे,” असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये : ॲड. यशोमती ठाकूर

“नवनीत राणा वेडी”

“नवनीत राणा वेडी असून काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. ते मीडियामध्ये येण्यासाठी हे सगळं करतात,” असंही मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.