नागपूर : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. दोन्ही जिल्ह्यातील बल्लारपूर, पाटणबोरी, सोनुर्ली, कोरपना आणि जिवती या परिसरासह अन्य ठिकाणी बिनधास्तपणे जुगार अड्डे चालवले जात आहे. या जुगार अड्ड्यांना आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

नागपूर परिक्षेत्रातील काही जिल्ह्यात ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरू असून चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हा सध्या आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, सोनुर्ली, कोरपना आणि जिवती यासह काही गावात ‘रमी क्लब’मध्ये मनोरंजनाच्या नावावर लाखोंचा जुगाराचा डाव भरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावाखाली आंतरराज्यीय जुगार अड्डे सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील मोठमोठे व्यावसायिक लाखो रुपयांची रोख घेऊन जुगार खेळण्यासाठी बसतात. चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दीडशेपेक्षा जास्त वाहनांनी जुगार खेळणारे येत असून याकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे. यासोबतच चंद्रपुरातील सीमावर्ती भागात राजुरा, कोरपना आणि जिवती या ठिकाणी ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर आता नव्याने जुगार अड्डे सुरू झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात परिसरातही गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरू झाले होते. दरम्यान, ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे घालून बंद पाडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्याने ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरु झाले. काही पोलीस कर्मचाऱ्यांना या जुगार अड्डे संचालकांनी हाताशी धरले आहे. राजकीय दबाब तंत्र वापरून जुगार अड्ड्यांना संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे. जुगार अड्डे सुरू झाल्यापासून गावातील तरुण वर्गसुद्धा जुगाराच्या नादी लागला आहे. तसेच गावात शाळकरी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुणसुद्धा जुगार अड्ड्याकडे वळत आहेत. त्यामुळे सोशल क्लबचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

पोलिसांचा आशीर्वाद?

‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डा भरवण्याच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होत असते. त्यामुळे रमी क्लबच्या नावे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते ठाणेदारापर्यंत सर्वांचाच आशीर्वाद असतो. त्यामुळे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात रमी क्लबच्या नावावर जुगार अड्डे भरवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बल्लारपूरसारख्या शहरात जुगार खेळण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्तीसुद्धा येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात कुठेही जुगार अड्डे सुरू नाहीत. रमी क्लब संचालकांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. त्यामुळे तेथे परवानगीने मनोरंजनाच्या उद्देशाने खेळ सुरू असतो. जिल्ह्यात कुठेही जुगार सुरू असल्यास थेट मला कळवा, नक्की कारवाई करण्यात येईल. – मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर