राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे सांगितले.

बावनकुळे म्हणाले, राज्यात सध्या विजेचा तुटवडा असला तरी मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरते असून, दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी पुरेसा कोळसा राखून ठेवण्यात आला आहे.

विजेची तूट निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात भारनियमन करण्याची वेळ आली. मात्र, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल, असे ते म्हणाले.

वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच महानगरांमध्ये सध्या तातडीचे भारनियमन सुरु झाले आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात येत आहे.

महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे शहरातील सर्वच विभागांमध्ये गुरुवारपासून भारनियमन सुरु झाले आहे. हे तात्पुरते भारनियमन असले तरी ते किती काळ सुरु राहील याबाबत सांगता येत नाही. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रोज किमान दोन तास वीज गायब होत आहे.