सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री खासगी प्रवासी वाहन आणि टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात ठाणे जिल्ह्य़ातील तीन ठार तर, नऊ जण जखमी झाले. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. सिन्नरहून शिर्डीकडे शनिवारी मध्यरात्री निघालेले खासगी प्रवासी वाहन वावी-पांगरी या गावादरम्यान आले असता समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसली. धडक बसल्यानंतर प्रवासी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. त्यामुळे वाहनाखाली दबले जाऊन ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे (३०), नेहा ज्ञानेश्वर ठाकरे (२७) या दाम्पत्यासह योगिता संतोष चौधरी (२५) यांचा मृत्यू झाला. ठाकरे दाम्पत्य ठाणे जिल्ह्य़ातील कुसुंबी येथील तर चौधरी या शहापूर तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी आहेत.