काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता या क्षेत्रात काम करावे की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र या अस्थिरतेवर मात करून कृषी क्षेत्रात प्रयोग होणे गरजेचे आहे. शेती आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर कशी होईल याचाही विचार प्रामुख्याने व्हायला हवा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केले.

ह्य़ुमन सव्‍‌र्हिस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या वतीने ठक्कर डोम येथे आयोजित ‘कृषिथॉन’ प्रदर्शनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी चव्हाण बोलत होते. चव्हाण यांच्या हस्ते या वेळी राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा ‘कृषी सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. शेतकऱ्याला अपेक्षित कर्जमाफी मिळायला हवी, तसेच त्याच्या शेतीलापूरक जोडधंदा हवा.

पाठीवर थाप देत त्याच्या मनातील भीती दूर करणेही गरजेचे असून शेती क्षेत्रातील अस्थिरतेचाही विचार होणे आवश्यक आहे. कृषिथॉनसारखे प्रदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरत असून या व्यासपीठावर विविध विषयांवर चर्चा व्हायला हवी, असेही चव्हाण यांनी सांगितले. आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी समस्येविषयी नाशिक जिल्ह्य़ाची भूमिका मांडली. आमदार सीमा हिरे यांनी ‘कृषिथॉन’ प्रदर्शन नाशिक शहराची ओळख होत असल्याचा उल्लेख केला.  आमदार बाळासाहेब सानप यांनी कृषिथॉनच्या आयोजकांना सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. या वेळी खासदार हेमंत गोडसे हेही उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवापर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनात ३०० हून अधिक कक्ष असून विविध  प्रकारची रोपे, पीक फवारणी, कृषीविषयक पुस्तके, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, अन्न प्रक्रिया उद्योगातील कंपन्यांकडील खाद्य पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना मत्स्य शेती, कुक्कटपालन, बांबू शेतीसह जोडधंदा म्हणून विविध पर्यायांची माहिती, कमी खर्च आणि वेळेत तसेच शारीरिक श्रम टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले विविध यंत्र, भ्रमणध्वनीच्या साहाय्याने विविध अ‍ॅप्सद्वारे कृषीसंबंधित माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.