महाराष्ट्रात आजही अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांसमोर पतीच्या मृतदेहासोबत डोक्यावर तूप लावून विधवेला अंघोळ, दहाव्या दिवशी तिचा सुहासिनीचा साज उतरवणे, तिचे पांढरे कपाळ कोणाला दिसू नये म्हणून अंधाऱ्या कोठडीत कोंडणे आदी अनिष्ठ प्रथाआहेत. या प्रथांना आता एक ‘कोमल’ आव्हान देण्यात आले आहे. काशीकापडी समाजात आजही पतीच्या निधनानंतर पत्नीला अशा अग्नीदिव्यातून जावे लागते. याबाबत समाजाच्या जात पंचायतीने काही नियम घालून दिले आहेत. या विरोधात येवला येथील कोमल वर्दे यांनी आवाज उठविला. कोमल यांचे वडिल शंकर वाटमकर यांचे २४ डिसेंबर रोजी पुण्यात निधन झाले. प्रथेप्रमाणे आईला काय यातना होणार हे लक्षात घेत कोमलने आई शोभा हिच्याशी चर्चा करत अन्य नातेवाईकांसमोर,‘ हे सारे थांबवा,’ अशी मागणी केली. हा विषय काशीकापडी समाजाचे पुणे येथील पंच सुनील गादेकर, शंकर वाडेकर, शरद भिंगारे, नारायण आंदेकर, दीपक वाडेकर, दीसीप वर्देकर, चंद्रकांत पालकर आदींसमोर ठेवला. यासाठी महापंचायत बोलवा असे संबंधिताकडून सांगण्यात आले. महापंचायतीसाठी काही लाखांमध्ये खर्च असल्याने कोमल यांनी असमर्थता दर्शवताच शोभा यांच्यासमोर मुलगी किंवा पंचायत हा पर्याय ठेवण्यात आला. परिणामी, दबावतंत्राला बळी पडत पंचायतीचा निर्णय शोभा यांनी मान्य केल्याने कोमल यांना पती समवेत वडिलांचे अंत्यदर्शन न घेताच माघारी फिरावे लागले.