संघटनात्मक काम व आक्रमक प्रचाराच्या जोरावर नाशिक मतदारसंघात सुधीर तांबे यांची बाजी पाच जिल्ह्य़ात प्रचार यंत्रणा उभी करता न येणे, नाशिक, जळगाव व नगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मग्न झालेले पदाधिकारी, जळगावमधील खडसे-महाजन गटातील सुप्त संघर्ष आणि अखेरच्या टप्प्यात शिवसेनेने विरोधात घेतलेली भूमिका.. या सर्वाची परिणती केंद्र व राज्यातील सत्तेची संपूर्ण ताकद पणाला लावूनही नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपच्या दारुण पराभवात झाली. अनुभवाच्या बळावर मोठय़ा फरकाने विजय संपादित करत काँग्रेस आघाडीने ही जागा राखत भाजपला चपराक दिली. शिवाय, गटा-तटातील राजकारण बाजूला ठेवल्यास भाजपला धडा शिकविता येतो, हा संदेश या निवडणुकीने दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ हा खरे तर काँग्रेसच्या सत्ताकाळापासून भाजपचा बालेकिल्ला. २००९च्या पोटनिवडणुकीत विरोधकांच्या ताब्यात गेलेली ही जागा पुन्हा खेचण्याकरिता भाजपने कंबर कसली. केंद्र व राज्यातील सत्तेचा पुरेपूर लाभ उठवत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, दोन्ही उमेदवारांमधील फरक पाहिल्यास भाजप स्पर्धेतही राहिला नसल्याचे लक्षात येते. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी होती. काँग्रेसने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना तर भाजपने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंचे जावई डॉ. प्रशांत पाटील यांना मैदानात उतरविले. काँग्रेसने राष्ट्रवादी व टीडीएफ आघाडीच्या सहकार्याने मोट बांधली. काँग्रेसमधील प्रदेश पातळीवरील नेत्यांचे गट-तट अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकत्र आले. नगर जिल्ह्य़ात काँग्रेसी नेत्यांच्या हाती शैक्षणिक संस्थांचे विस्तृत जाळे आहे. शिवाय, तांबेंना मागील दोन निवडणुकींचा अनुभव कामी आला. मितभाषी स्वभाव, पाचही जिल्ह्य़ांत राखलेला जनसंपर्क, त्याआधारे उभारलेली सक्षम प्रचार यंत्रणा ही त्यांची जमेची बाजू ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या कोलाहलापूर्वीच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे अवघड काम त्यांनी पूर्ण केले. नोटाबंदी, कृषिमालाचे गडगडलेले भाव यामुळे सर्वसामान्यांमध्ये असणारा रोष पथ्यावर पडला आणि वारंवार पराभवाला तोंड देणाऱ्या काँग्रेसला ४० हजारांहून अधिकच्या फरकाने या मतदारसंघात विजयी हॅट्ट्रीक साधता आली. राष्ट्रवादीने आधी उमेदवारीही जाहीर केली होती. पण औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादीने उमेदवारी मागे घेत काँग्रेसला पाठिंबा दिला. त्याचाही काँग्रेसला फायदा झाला. अतिआत्मविश्वास नडला नेमकी याउलट भाजपची अवस्था झाली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्य़ांत विखुरलेल्या मतदारसंघांत काही अपवाद वगळता भाजपचे प्राबल्य आहे. असे असताना प्रचारार्थ यंत्रणा उभी करून डॉ. पाटील हे मतदारापर्यंत पोहोचू शकले नाहीत. जावयाच्या प्रचारार्थ संरक्षण राज्यमंत्र्यांनी शर्थीने प्रयत्न केले. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी अर्ज भरण्यावेळी उपस्थित राहून या जागेचे महत्त्व लक्षात आणून दिले होते. जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपविल्याने खडसे गटाने मनापासून साथ देणे टाळले. मोदींची लाट आजही कायम असल्याच्या भ्रमात सर्व नेतेमंडळी राहिली. प्रचारात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखविले गेले. परंतु, सुशिक्षित मतदार बधले नसल्याचे निकाल दर्शवितो. मुंबई महापालिकेत युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेने पदवीधरमध्ये भाजपला साथ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नाशिक, अहमदनगर व जळगाव जिल्ह्य़ात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्या गदारोळात पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे धोरण ठेवले. या सर्व घडामोडी केंद्र व राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या पराभवाला हातभार लावणाऱ्या ठरल्या.