टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहर युवा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी रोजगार दो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहर काँग्रेसचे पदाधिकारी, आंदोलनकर्त्यांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षांला दोन कोटी रोजगार निर्माण केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. वस्तुस्थिती वेगळी आहे. लोक मोठय़ा प्रमाणावर बेरोजगार झाले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शहर युवा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी, जीएसटी अशा वेगवेगळ्या कारणांनी रोजगारावर गदा आली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. पंतप्रधानांचे आश्वासन टाळेबंदीच्या काळात फोल ठरले. पंतप्रधानाच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे अडचणी निर्माण झाल्याचे काँग्रेसचे युवा पदाधिकारी स्वप्निल पाटील यांनी सांगितले. शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारत पक्ष कार्यालयासमोरच आंदोलन करण्याची सूचना केली. पोलिसांच्या सूचनेकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत युवा काँग्रेसचे पदाधिकारी, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गर्दी जमविणे, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनाची माहिती देणारा फलक पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला होता. पक्ष पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे फलकावर लावण्यात आली होती. त्यात काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश के लेले माजी आमदार निर्मला गावित यांचे छायाचित्रही होते. फलक तयार करणाऱ्याकडून ही चूक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.