नाशिक : विभागात करोना बाधितांची एकूण संख्या साडेआठ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक ३८४६ रुग्ण नाशिकमध्ये असून त्या खालोखाल जळगावचा क्रमांक आहे. विभागात आतापर्यंत ५१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचारानंतर ४६७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ३२११ हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागासह शासकीय यंत्रणा प्रयत्नशील असल्या तरी नाशिक शहरासह धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रादुर्भाव वेगाने होत आहे. मालेगावमध्ये स्थिती नियंत्रणात आली असली तरी नाशिक शहरात काही दिवसांपासून दररोज १०० ते १५० नवीन रुग्ण आढळत आहे. रविवारी दुपापर्यंत त्यात नव्या ६५ रुग्णांची भर पडली. यामुळे नाशिक शहराची रुग्णसंख्या १८८३ वर पोहचली. करोनामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला. सध्या १०५० रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या चार हजारच्या दिशेने चालली आहे. आतापर्यंत २१५ जणांचा मृत्यू झाला असून उपचाराअंती दोन हजार ४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या संपूर्ण जिल्ह्यात १५८० रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६५, चांदवड आठ, सिन्नर ३९, दिंडोरी १७, निफाड ४८, नांदगाव १३, येवला ३८, त्र्यंबकेश्वर १०, बागलाण आठ, इगतपुरी २५, मालेगाव ग्रामीण १२ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.

प्रारंभी करोनाचा कहर अनुभवणाऱ्या मालेगाव शहरात तुलनेत बरी स्थिती आहे. सध्या १५१ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील बाधितांची एकूण संख्या १०१७ असून उपचारानंतर ७९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात करोनावर नियंत्रण मिळवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे ३०८४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील २२१ जणांचा मृत्यू झाला. उपचाराअंती १८३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या १०२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठय़ावर उभी आहे. ४८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ४२१ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ४०९ बाधित रुग्ण आढळले. उपचाराअंती २८३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ११२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १५७ आहे. उपचाराअंती ६० रुग्णांना घरी सोडण्यात आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९१ रुग्ण उपचार घेत आहेत.

गर्दीत जाणे टाळावे

करोनाची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. प्रत्येकावर आलेले हे संकट आहे. काही नियम पाळून आपल्याला त्याला तोंड द्यावयाचे आहे. स्वत:सह कुटुंबिय, मित्र परिवारासाठी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यायला हवीत. आपण स्वत: गर्दीला कारण ठरू नये. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रणाची पक्की व्यवस्था करावी. तेथील रचनेत आवश्यकतेनुसार बदल करावेत. कोणतेही छोटेखानी कार्यक्रमही आयोजित करू नये. कोणी तसे कार्यक्रम ठेवण्याची चूक केली तर आपण शक्यतो सहभाग टाळावा. मी गर्दीला कारण ठरणार नाही आणि मी गर्दीत जाणार नाही या दोन महत्वाच्या नियमांचे पालन करावे.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)