महापौर अशोक मुर्तडक यांची ग्वाही
शहर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, तसेच परवानगी मिळविताना होणारी धावपळ टाळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्यात येईल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पालिकेत झाली.
यावेळी महापौरांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेला अनुसरून केलेल्या सूचनांप्रश्नी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे नमूद केले. मनपाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या मंडळाच्या अखत्यारीत असणाऱ्या विभागीय कार्यालयात एकाच ठिकाणी देण्याच्या दृष्टीने एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध
सूचना केल्या.
त्यामध्ये मंडपासाठी आकारण्यात येणारा कर घेऊ नये, पर्वणी व गणेशोत्सव काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मिरवणूक मार्गातील अडथळे काढावेत, मिरवणूक मार्गावरील धोकेदायक विद्युत खांब काढावेत, वीजपुरवठा खंडित करू नये, गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळे पंचवटीपर्यंत येण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, दुष्काळग्रस्तांना मदत करावी, प्रत्येक मंडळाजवळ निर्माल्य कलश ठेवावेत, दीड दिवसाच्या विसर्जनाची व्यवस्था करावी, मूर्ती दानासाठी गणेशभक्तांकडे आग्रह करू नये, स्वेच्छेने मूर्ती दान केल्यास त्याचा स्वीकार करावा, मिरवणूक मार्गातील महत्त्वाच्या चार चौकांत रुग्णवाहिका ठेवाव्यात, गोदावरीची स्वच्छता कायम राहण्यासाठी प्रयत्न, मंडळांचे फलक काढू नयेत, पोलिसांकडून मिळणाऱ्या परवानग्या त्वरित मिळाव्यात, वीज मंडळाकडून आकारण्यात येणारी
अनामत परत मिळण्याची व्यवस्था करावी, अशा विविध सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, आ. सीमा हिरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मूर्ती दान संकल्पनेला हिंदू जनजागृतीचा विरोध
गणेश विसर्जन करताना मूर्ती दान करण्यासाठी पालिका प्रशासनासह पर्यावरणप्रेमी संस्था प्रयत्नशील असताना मूर्ती दान अथवा त्या कृत्रिम हौदात विसर्जित करण्याच्या संकल्पनेला हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शविला आहे. भक्तांनी मूर्ती धर्मशास्त्रानुसार विसर्जित कराव्यात, असे आवाहन पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाचे महंत धोंगडे महाराज, सनातनचे नंदकुमार जाधव, डॉ. शिल्पा कोठावळे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले आहे. मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यामागे धर्मशास्त्रीय कारण आहे.
मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास त्यातील पवित्रके सर्वदूर पसरून भाविकांना लाभ होतो. काहींकडून चुकीच्या पद्धतीने विसर्जन होत असल्याबाबत जनजागृती सुरू आहे. त्या अंतर्गत पत्रकांचे वाटप, शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देणे, गणेश मंडळाचे प्रबोधन करणे, प्रशासनाला निवेदन देणे, आदींच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे जाधव यांनी नमूद केले. गणेशोत्सवात प्रदूषणाचा बागुलबुवा उभा केला जातो. दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रभावी कृती करत नसल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले.