लग्नात मानपान, हुंडा दिला नाही यावरून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि शारीरिक छळाला कंटाळत विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रश्मी श्रीवास्तव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

माया वर्मा यांची मुलगी रश्मी हिचा विवाह नाशिकरोड येथील माणिकनगर येथे राहणाऱ्या मनोज श्रीवास्तव यांच्याशी झाला. लग्नानंतर महिनाभरातच सासरच्या मंडळीकडून लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही यावरून रश्मी यांना टोमणे मारण्यास सुरुवात झाली. माहेरून पैसे घेऊन यावेत अशी वारंवार मागणी होऊ लागली. यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक, शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळत शनिवारी राहत्या घरी विषारी औषध सेवन करत रश्मीने आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी वर्मा यांनी सासरच्या मंडळीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.