* छगन भुजबळ यांचा भाजपवर निशाणा * जलपूजन कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या देवसाने अर्थात मांजरपाडा प्रकल्पावरून जिल्ह्य़ात नव्या राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. बोगद्याचे रखडलेले काम पूर्ण झाल्यामुळे पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शक्तिप्रदर्शन करत जलपूजन केले. प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तो पूर्णत्वास जाईपर्यंत आपणच अविरत पाठपुरावा केला असून कामाचे श्रेय घेण्यावरून भांडण नाही आणि कोणी श्रेय घ्यायचे असा लढादेखील नाही. सर्व काम करणारे आपणच एकमेव असल्याने त्यात लढाई कसली? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करून भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस-राष्टवादी आघाडीच्या कार्यकाळात सुरू झालेला मांजरपाडा प्रकल्प सेना-भाजप युतीच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेला. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आधीपासून श्रेयवाद रंगला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांनी मांजरपाडय़ाचा मुद्दा मांडला होता. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मांजरपाडय़ाचे वेगळे महत्त्व असून सत्ताधारी-विरोधकांसाठी तो कळीचा मुद्दा ठरला आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी येवला, चांदवडसह दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. गुजरातच्या समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे महाराष्ट्रात वळविणारा राज्यातील मांजरपाडा हा पहिलाच प्रकल्प आहे. १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी आणले गेले. मांजरपाडा या महत्त्वाकांक्षी योजनेला नोव्हेंबर २००६ मध्ये जलसंपदा विभागाची मंजुरी मिळवली. आघाडी सरकारच्या काळात ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले होते. त्या वेळी उर्वरित कामांसाठी ७० ते ८० कोटींचा निधी जलसंपदा विभागाला दिला गेला होता. परंतु, भाजप-सेना युती सरकारने ते पैसे दुसरीकडे वळविले. सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली मांजरपाडय़ाचे काम तीन वर्षे बंद राहिले. कारागृहात असताना आणि तेथून आल्यानंतर आपण नव्याने पाठपुरावा केला, असेही भुजबळ यांनी सांगितले. गिरीश महाजन यांच्या हस्ते आज जलपूजन भुजबळांनी जलपूजन केल्यानंतर भाजपने लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्पाच्या जलपूजन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. पावसाचे प्रमाण कमी होत असताना या योजनेतून तुटीच्या गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव, ओझरखेड आणि दरसवाडी पोच कालवा या प्रकल्पांना त्याचा लाभ होणार आहे. मांजरपाडा पूर्णत्वास नेण्याचे श्रेय राष्ट्रवादीला घेता येऊ नये, असे नियोजन भाजपने केले आहे.