मतदान चाचणीतून पारदर्शकतेची अनुभूती

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी दाखल झालेल्या पाच हजार ४७९ व्हीव्ही पॅट यंत्रांच्या तपासणीला मंगळवारी सुरूवात करण्यात आली. त्या अंतर्गत व्हीव्ही पॅट यंत्र ‘बॅलेट युनिट’ आणि ‘कंट्रोल युनिट’ला जोडून मतदानाची चाचणी घेतांना सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पारदर्शकतेची अनुभूती मिळाली.

मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्ही पॅटचा वापर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, आधी बॅलेट युनिट मतपत्रिका आणि कंट्रोल युनिट आणले गेल्यानंतर पाच हजार ४७९ व्हीव्ही पॅट यंत्रे जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली. निवडणुकीत जिल्ह्य़ातील चार हजार ४४६ मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.

प्राप्त झालेल्या यंत्रांच्या प्राथमिक तपासणीचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आल्याचे तहसीलदार (निवडणूक शाखा) गणेश राठोड यांनी सांगितले. या कामात एकूण ५० कर्मचारी सहभागी होणार असून महिनाभर ते चालणार आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी सायंकाळी दिले गेले. यामुळे पहिल्या दिवशी २० कर्मचाऱ्यांनी व्हीव्ही पॅट यंत्रांच्या पडताळणीचे काम हाती घेतले.

या प्रक्रियेत व्हीव्ही पॅट यंत्र प्रत्येक मतदान यंत्राला जोडून मतदानाची चाचणी घेतली जाईल. प्रात्यक्षिक स्वरूपात कर्मचाऱ्यांमार्फत मतदान केले जाते. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह व्हीव्ही पॅट जोडून यंत्रणा सदोष नसल्याची खातरजमा केली जात आहे. या कामात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी कशी ठरेल याची अनुभूती मिळत आहे.

प्रारंभी दररोज किमान २०० यंत्रांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. पुढील काळात हा वेग वाढत जाईल. महिनाभरात सर्व व्हीव्ही पॅट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटला जोडून तपासणीचे काम पूर्णत्वास नेले जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. हे काम झाल्यानंतर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत व्हीव्ही पॅट यंत्राबाबत गावोगावी जनजागृती करण्यात येईल. जिल्ह्य़ातील सर्व मतदान केंद्रे, आठवडे बाजार आणि गावोगावी पथकामार्फत प्रात्याक्षिक सादर करून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाईल.

कार्यपद्धती अशी

मतदान यंत्राला व्हीव्ही पॅट जोडलेले असते. मतदाराने मतदान केल्यानंतर पावती स्वरुपात त्यातून चिठ्ठी बाहेर पडून बॉक्समध्ये समाविष्ट होते. ती मतदाराला पाहता येते. जेणेकरून त्याने केलेले मतदान बरोबर नोंदविले गेले की नाही हे त्यांना लक्षात येते.