दिंडोरी तालुक्यातील वाघाड कालव्याला पिण्यासाठी सोडलेले पाणी पोटचाऱ्यांना तसेच गावतळ्यांमध्ये न सोडताच अवघ्या चार दिवसांत बंद केल्याने वाघाड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्य़ातील सर्व कालव्यांचे पाणी पंधरवडा किंवा महिनाभर नदी, नाले, पोटचाऱ्यांना सोडले जात असताना वाघाड लाभक्षेत्रावरच अन्याय का, असा प्रश्न लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वाघाड लाभक्षेत्राखालील हातनोरे, निगडोळ, पाडे, निळवंडी, कादवा-म्हाळुंगी, उमराळे, दिंडोरी, वनारवाडी, तळेगाव, अक्राळे, खतवड, आंबे, ढकांबे, वलखेड मडकीजाम, जंबूटके, जवळके, जानोरी, गणोरवाडी आदी गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून कूपनलिका कोरडय़ा झाल्या आहेत. हजारो हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. वाघाड धरणातून शेतीच्या सिंचनासाठी राखीव करण्यात आले होते. परंतु शासन निर्णयानुसार सदर आरक्षण रद्द करत संपूर्ण पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आले. येथील पाणीवाटप महासंघाचे नियोजन अत्यंत आदर्शवत असताना प्रशासनाने पाणीवाटप संघ व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने येथे जनता विरुद्ध प्रशासन असा संघर्षही सुरूझाला होता. हक्काचे राखीव पाणी सोडावे, यासाठी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, वाघाड महासंघाचे शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, शिवाजी बाबा पिंगळे आदींनी शेतकऱ्यांना संघटित करत आंदोलन केले. पालकमंत्र्यांची भेट घेत व्यथा मांडल्यावर २१ एप्रिल रोजी पिण्यासाठी दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले होते. परंतु हे पाणी चार दिवसांनंतर बंद करत प्रशासनाने सर्वाना नाराज केले. दुसरीकडे महिनाभरापासून दिंडोरी तालुक्यातील व जिल्ह्य़ातील विविध कालव्यांना व नद्यांना पिण्यासाठी पाणी सुरू असून ते विविध पोटचाऱ्या, नदी-नाले, ओहळ, साठवण बंधारे, गावतळे भरण्यासाठी वापरले जात आहे. असे असताना वाघाड लाभक्षेत्रावर अन्याय झाला असून चाऱ्या, गावतळे भरली गेली असती तर पुढील काही दिवस कूपनलिका व विहिरींना पाणी उतरून टंचाईच्या झळा दूर झाल्या असत्या. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्य़ातील इतर लाभक्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा परिपूर्ण लाभ दिला आहे. देत आहेत. त्याप्रमाणे सदर भागाची टंचाई परिस्थिती पाहता वाघाड लाभक्षेत्रात सर्वत्र पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने येथील सिंचनासाठी राखीव असलेले पाणी पिण्यासाठी राखीव केले असले तरी त्याचा वापर लाभाक्षेत्रातच पिण्यासाठी करावा, जर पुन्हा पालखेड धरणात सोडून इतरत्र नेण्याचा प्रयत्न झाला तर जनतेच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.