राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजन

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अपंगांसाठी पहिली महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आली आहे. नाशिक केंद्रावर होणाऱ्या अंतिम फेरीत नाशिक, मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर येथील १५ संघ सहभागी होणार आहेत.

नाशिक केंद्रातून प्राथमिक फेरीत २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रबोधिनी ट्रस्ट संचालित श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिराच्या वतीने शीला सामंत लिखित ‘वनराई’, प्रबोधिनी ट्रस्ट संचालित प्रबोधिनी विद्यामंदिरच्या वतीने मनीषा नलगे लिखित ‘मोल अनमोल’, दुपार सत्रात इगतपुरी येथील इंदिरा गांधी कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या वतीने प्रदीप जोशी लिखित ‘छोटय़ांनी जिंकले’, मुंबई येथील रोटरी संस्कार धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भरत मोरे लिखित ‘झेप’, दादर येथील श्रीमती कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंडच्या वतीने सुनीता कुलकर्णी लिखित ‘बाहुली’, नवी मुंबई मनपा ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण आणि सुविध़ा केंद्राच्या वतीने शांताराम भेंडे लिखित ‘किलबिल’ बालनाटय़े सादर होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात नाशिक येथील पडसाद अपंग उपचार आणि पुनवर्सन केंद्राच्या वतीने किशोर पाठक लिखित ‘फुटपाथ’, पुणे येथील जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन स्पेशल केअरच्या वतीने नयना डोळस लिखित ‘माझी माय’, पुणे येथील मानव्यच्या वतीने यतिन माझिरे लिखित ‘थेंबाचे टपाल’, सोलापूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या वतीने आनंद खरबस लिखित ‘देवमाणूस’, लातूर येथील सुशीलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालयाच्या वतीने सुनीता कुलकर्णी लिखित ‘खुडखुड’ आणि नाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाच्या वतीने स्वाती घारपुरे लिखित ‘आणि प्रकाश पडला’ ही बालनाटय़े सादर होणार आहेत.

सर्व प्रयोगांना विनामूल्य प्रवेश 

स्पर्धेत २७ फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात नाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वतीने धनंजय वाबळे लिखित ‘एक पाऊल’ आणि अमरावती येथील गंधर्व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सचिन गोटे लिखित ‘शब्दांच्या गोष्टी’ ही नाटके सादर होतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्वाती काळे या वेळी उपस्थित राहणार आहेत. सर्व नाटय़प्रयोग रसिकांसाठी खुले असल्याने नाशिककरांनी स्पर्धेस मोठय़ा संख्येने उपस्थित राहत कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.