नाशिक : मराठा आरक्षणाची लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा राज्य शासनाच्या वतीने न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल. तसेच मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरु करणे, मराठा मुलीसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करू, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

रविवारी मराठा क्रोंती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता भुजबळ यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या समवेत दिल्लीत बैठक आयोजित केल्याने त्यासाठीो जात असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मराठा क्रोंती मोर्चाच्या समन्वयकांना कळविले होते. तसेच हा दौरा अचानकपणे रद्द झाल्याने पुन्हा समन्वयकांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांनुसार चर्चा करून सकाळी १०.३० वाजता तसेच दुपारी १.३० वाजता भेटण्याची वेळ दिलेली होती. तसेच मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. परंतु, भेटण्यासाठी कार्यालयात पोहचण्याच्या आधीच मोर्चा समन्वयकांनी आपल्या विरोधात प्रक्षोभक भाषणे आणि घोषणाबाजी करून काढता पाय घेतला. समन्वयकांना भेटायला वेळ दिलेली असतांना देखील समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले, याबद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त के ली. कुठलाही मोर्चा करतांना त्या मोर्चाचे नेतृत्व करण्याची कुणा एका नेत्याची जबाबदारी असते, असे सांगत भुजबळांनी मोर्चातील त्रुटीवर बोट ठेवले. मराठा आरक्षणाचे आपण विरोधक नाही. तरी देखील केवळ छगन भुजबळबद्दल आकस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळ यांच्याविषयी क्रांती मोर्चाच्या मनात कुठलाही आकस नाही. शुक्रवारी घडलेला प्रकार असमन्वयातून झालेल्या गैरसमजाचा परिणाम असला तरी दुर्दैवी होता याची जाणीव असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे  राज्य समन्वयक करण गायकर यांनी मांडले. सुनील बागुल यांनीही मनोगत व्यक्त के ले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव, नाना महाले आदी उपस्थित होते.