सहा जणांना वाचविण्यात यश

गणरायाला निरोप देताना गुरुवारी जिल्ह्य़ात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवक बुडाले, तर सहा जणांना वाचविण्यात यश आले. गंगापूर परिसरातील सोमेश्वर धबधबा येथे तीन युवक गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात पाय घसरून ते बुडाले. जीवरक्षक आणि स्थानिकांनी धाव घेऊन रोहित गवई आणि राजू भालेराव यांना वाचविले. पण त्यांचा सहकारी गणेश धांगडे सापडला नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

दुसरी घटना रामकुंडालगतच्या म्हसोबा पटांगण परिसरात घडली. गणेश विसर्जन करताना खोलीचा अंदाज न आल्याने जगन्नाथ शर्मा, मनोज भारती, श्रीवास्तव आणि राहुल झगडे हे तीन जण बुडाले. हे लक्षात आल्यावर अग्निशमन दलाचे जवान, जीवरक्षकांनी पाण्यात उडय़ा मारल्या. तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.

तिसरी घटना तपोवनमध्ये घडली. गणेश विसर्जन करताना बुडणाऱ्या वैभव तेजेकरला सुखरून बाहेर काढण्यात आले. चौथी घटना त्र्यंबकेश्वरलगतच्या पहिणे येथील घडली. शहरातील काही युवक गणेश विसर्जनासाठी गेले होते. मूर्ती घेऊन ते पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने युवराज राठोड (२२, सिडको) बुडाला. पोलीस, जीवरक्षकांनी धाव घेऊन शोध मोहीम राबविली. बऱ्याच कालावधीनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अनंत चतुदर्शीच्या पूर्वसंध्येला गणेश भक्तांना दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. नद्या, नाल्यांमध्ये पाणी असल्याने विसर्जनावेळी दक्षता घ्यावी, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, उपरोक्त घटनांमध्ये भक्तांनी तशी दक्षता घेतली गेली नसल्याचे पाहायला मिळाले.