स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींनी ‘खेडय़ाकडे चला’ असा संदेश दिला खरा, पण स्वातंत्र्यानंतरही गांधीजींना अपेक्षित असा खेडय़ाचा विकास झाला नाही. या पाश्र्वभूमीवर, खेडय़ांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने काय करता येईल, यावर मंथन करण्यासाठी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्यावतीने रविवारी अनुभव समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. देवळाली कॅम्प येथील लेस्ली सोहनी सेंटर येथे हा मेळावा होईल. शहरीकरण, औद्योगिकीकरण या संकल्पनांच्या मागे धावताना आजही खेडय़ांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास हा मुद्दा धरून अभिव्यक्तीने उत्तर महाराष्ट्रातील युवकांचे संघटन करून त्यांना गाव विकासाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी विविध माध्यमांचे कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांना माध्यम साक्षर आणि चिकित्सक केले आहे. गाव विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या युवकांमध्ये ज्ञान कौशल्याची देवाण-घेवाण करता यावी यासाठी हा एकदिवसीय अनुभव समाज मेळावा होत आहे. त्यात अनुभव शिक्षा प्रक्रियेतून सामाजिक जाणिवा जागृती करणारे युवक जे गाव विकासाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावत आहे ते सहभागी होणार आहेत. जळगाव येथील विजय कोळी, दिनेश भंगाळे, शोभा पवार, स्वाती शिरोडे, नंदुरबार येथील माखन पवार, नाशिकमधून पत्रकार ज्ञानेश्वर उगले, भाग्यश्री नाशिककर, शरद उगले, धुळे जिल्ह्य़ातून मनीष वधवा हे युवा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात प्रामुख्याने युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, अधिकाधिक युवक-युवतींनी गाव विकासाच्या प्रक्रियेत कसे योगदान देता येईल, समाजात फोफावत चाललेल्या भ्रष्टाचाराला आणि लोकहिताला बाधक ठरणाऱ्या घटनांविषयी विचार मंथन होणार आहे. तसेच त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान, स्थानिक पातळीवर करत असलेल्या प्रयोगांचा नव्या पिढीला उपयोग व्हावा याविषयीचे नियोजन करण्यात येणार आहे. मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी अभिव्यक्ती अनुभव शिक्षा केंद्राचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक भिला ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या वेळी अनुभव शिक्षा प्रक्रियेतून ‘युवांचे फुलत गेलेले नेतृत्व’ या चित्रपटाचे प्रदर्शन करून चर्चा होईल. तसेच विविध खेळ, गाणे, चित्रपट आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अभिव्यक्ती अनुभव शिक्षा प्रक्रियेशी जोडलेल्या युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२१५५९७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.