छगन भुजबळ यांचे प्रतिपादन नाशिक : गोदावरी नदी प्रदूषित झाल्याने नाशिकच्या जनतेची मान शरमेने खाली जाते. त्यामुळे गोदा साफ करण्याची सामूहिक जबाबदारी ही नाशिककरांची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी के ले. नमामि गोदा फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात भुजबळ यांच्या हस्ते नदी राष्ट्रगीताचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात भुजबळ यांच्यासह पाणीतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, गायक शंकर महादेवन, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुंबईचे (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त विश्वास नांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथूनही काही जण सहभागी झाले होते. गोदावरी (दक्षिण गंगा) ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती अविरल, निर्मल व स्वतंत्र राहावी यासाठी १२ वर्षांपासून नमामि गोदा फाऊंडेशन प्रयत्नरत आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरी कशी स्वच्छ होऊ शकते याचा उत्तम संदेश दिला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, उपाध्यक्ष अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि त्यांचे सहकारी हे देखील सातत्याने यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतीय लोक नदीला माता मानतात. गोदावरी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे. ज्या नदीला आपण जीवनदायिनी किंवा माता मानतो तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मध्यंतरी रविशंकर हे नाशिकला आले होते. आणि गोदावरीची परिस्थिती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्या नदीवर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत अशा नदीचे संवर्धन हे लोकचळवळीतून झाले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले. डॉ. राजेंद्र सिंह यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते जर तयार झाले तर पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत, असेही भुजबळ यांनी नमूद केले.