हंगामाच्या सुरुवातीला तीन-चार आठवडे ज्यांची द्राक्ष बाजारात गेली, त्यांना प्रति किलोस ९० ते १२० रुपयांदरम्यान भाव मिळाले. पुढील काळात जशी आवक वाढली, तसे दर घसरले. आज निर्यातक्षम माल ५० ते ५५ आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी २५ ते ३० रुपये किलो दराने बागांची खरेदी होत आहे. जादा दर मिळवण्याच्या नादात प्रारंभी आंबट माल बाजारात गेल्याने नाशिकच्या द्राक्षांच्या प्रतिमेवर परिणाम झाला. देशांतर्गत बाजारात सांगली व सोलापूरच्या तर परदेशात चिलीच्या द्राक्षांशी नाशिकच्या द्राक्षांना स्पर्धा करावी लागत आहे. भाव उतरंडीला लागल्याने प्रारंभीच्या उंची दराचा लाभ मिळविणारे काही मोजके घटक वगळता उर्वरित शेतकऱ्यांसाठी यंदाचा द्राक्ष हंगाम आतबट्टय़ाचा ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. चांगले र्पजन्यमान आणि हवामान यामुळे यंदा द्राक्षांचे विपूल उत्पादन झाले. मागील दोन-तीन वर्ष अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळाच्या गर्तेत सापडणाऱ्या द्राक्ष शेतीला यावेळी निसर्गाची साथ मिळाली. मात्र, अखेरच्या टप्प्यात इतर कृषिमालाच्या भावाप्रमाणे त्याची स्थिती झाली. नाशिक जिल्'ाात तब्बल सव्वा दोन ते अडीच लाख एकरवर द्राक्ष बागा आहेत. भावातील चढ-उताराची दोन कारणे द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील सांगतात. यंदा थंडीने अधिक काळ मुक्काम ठोकला. यामुळे द्राक्षांमध्ये साखर उतरली नाही. सुरुवातीला कमी साखरचा अर्थात काहीसा आंबट माल बाजारात गेल्याने ग्राहक नाराज झाले. सोलापूर व सांगली जिल्'ाातील शेतकरी प्रामुख्याने बेदाणा निर्मितीसाठी द्राक्ष करतात. सोनाका सारखी दिसायला देखणी असणारी त्यांची द्राक्षे स्थानिक बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीस आली. उपरोक्त घटक अन् विपुल उत्पादन याची परिणती भाव घसरण्यात झाल्याचे पाटील यांचे निरीक्षण आहे. आजही जिल्'ाातील अनेक बागांमध्ये काढणी बाकी असून पुढील महिनाभर हंगाम चालेल. पण, भाव वधारण्याची शक्यता नाही. निर्यातदार व व्यापाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत हंगामाच्या प्रारंभी निर्यातीद्वारे चांगला भाव मिळतो. यामुळे निर्यातदारांनी निकषात बसणारी, पण कमी गोडवा असलेली द्राक्ष परदेशात पाठवत भारतीय द्राक्षांची प्रतिमा खराब केली. जादा भाव मिळविण्यासाठी केलेली कसरत भाव कोसळण्यास कारक ठरली. पुढील काळात निर्यातक्षम व गोडवा असणाऱ्या दर्जेदार मालाचे उत्पादन करणारे शेतकरी भाव घसरल्याने अडचणीत सापडले. त्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांनी उचलला. निर्यातक्षम द्राक्ष त्यांनी देशांतर्गत बाजारपेठेसाठी कमी भावात खरेदी केली. निर्यातदार व व्यापाऱ्यांकडून महिना-दीड महिना पैसे मिळत नाही. दुसरीकडे बँक व औषध विक्रेत्यांच्या तगाद्याला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. निर्यातीवर भिस्त द्राक्ष निर्यातीवर अनेकांची भिस्त असते. थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिकचमन, शरद सीडलेस, जम्बो सीडलेस या वाणांपैकी थॉमसन सीडलेस ही द्राक्ष निर्यात होतात. द्राक्ष मण्यांना विहीत आकारमान मिळावे म्हणून अशा बागांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्याचा खर्चदेखील तुलनेत बराच असतो. निर्यातीद्वारे चांगला नफा कमावण्याची संधी यंदा साधता आली नाही. युरोपच्या बाजारात आतापर्यंत ७८ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. गतवर्षी हा आकडा ८४ हजार मेट्रिक टन असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले. गतवर्षी इतकीच किंवा त्याहून अधिक निर्यात होणार असली तरी दर कमी मिळाले. चिली देशातून द्राक्ष युरोपीयन बाजारात दाखल झाल्यामुळे त्याचा फटका भारतीय द्राक्षांना बसला. हंगामाच्या सुरूवातीला आणि अखेरच्या टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षाच्या भावात ४० ते ५० रुपयांनी फरक पडल्याकडे खापरे यांनी लक्ष वेधले. पिंपळगाव बसवंत येथे अनंत मोरे यांची द्राक्ष बाग आहे. गतवर्षीच्या दुष्काळामुळे द्राक्ष वेलींच्या आरोग्यावर झालेला परिणाम या वर्षी उत्पादनावर झाल्याचे ते सांगतात. हंगामाच्या प्रारंभी दोन ते तीन आठवडय़ात बाजारभावाचे चित्र बदलले. द्राक्ष हे वार्षिक पीक आहे. वर्षभराचा एकरी खर्च सुमारे दोन लाखाच्या घरात आहे. एक एकरातून सरासरी १० टन मालाचे उत्पादन होते. सध्याच्या भावाचा विचार केल्यास हाती पडणाऱ्या पैशातून उत्पादन खर्च कसाबसा भागविला जाईल. ही बाब गंभीर स्थिती दर्शविते असे त्यांचे म्हणणे. व्यापारी बागा खरेदीसाठी फिरकत नाही. खेडगावचे रमेश सोनवणे यांचीही वेगळी प्रतिक्रिया नाही. प्रारंभी ज्यांना चांगले भाव सापडले, त्या शेतकऱ्यांची संख्या केवळ पाच ते आठ टक्के इतकीच आहे. निर्यात वा स्थानिक बाजारात माल नेऊनही उत्पादन खर्च भरून चांगला नफा होईल याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. वणी येथे १० एकर क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाऱ्या धिरज तिवारी यांच्या मालास मिळालेला भाव बरेच काही सांगतो. वेगवेगळ्या टप्प्यात त्यांच्या बागेतून द्राक्ष काढणी झाली. प्रारंभी ९३ रुपये, नंतर ४५ आणि अखेरीस ३० रुपये किलोने निर्यातक्षम द्राक्ष देण्यात आली. ज्यांचे क्षेत्र कमी होते अन् माल लवकर काढला गेला, त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, ज्यांचे क्षेत्र मोठे आहे, त्यांना सध्याच्या ३० रुपये भावातून काही हाती पडणार नसल्याचे ते सांगतात. १० ते १२ वर्षांपूर्वी जो दर होता, तोच आज मिळत आहे. दशकभरात मजुरी, औषधे व तत्सम खर्चात दुपटीहून अधिकने वाढ झाली. परंतु, मिळणारा भाव ‘जैसे थे’ राहिला. बागांवर झालेला खर्च आणि मिळणारी रक्कम यांचा ताळमेळ बसविणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.