दोन दिवसांत २०० घरांचे नुकसान; वीज पडून महिलेचा मृत्यू सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात नुकसानीचे सत्र कायम राहिले. येवला तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात झाडाची फांदी अंगावर पडून एक जण जखमी झाला. भाजीपाल्यासह कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने हरितगृहांसह वेगवेगळ्या भागात सुमारे २०० घरांचे नुकसान झाले. जिल्ह्यात बुधवार आणि गुरूवारी सायंकाळी वादळी वारा, गारांसह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पारेगाव येथे शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या शोभा अनिल काळे (२८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. झाडाची फांदी पडून निफाडच्या धारणगांव वीर येथील अशोक बोडके हे गंभीर जखमी झाले. दिंडोरी तालुक्यात ९० घरांचे नुकसान झाले. ९५ हेक्टरवरील ऊस, द्राक्ष, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. कळवण तालुक्यात १२० ते १३० घरांचे नुकसान झाले. सटाणा तालुक्यात डांगसौंदाणे, नाशिक तालुक्यातील गिरणारे, शिंदे, इगतपुरीतील घोटी, धारगाव, पेठ तालुक्यातील जोगमोडी मंडळात पाऊस झाला. जिल्ह्य़ात ३४ मिलीमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथे शेटनेटचे नुकसान झाले. बुधवारी अनेक भागास गारपिटीचाफटका बसला होता. दिंडोरीच्या उमराळे मंडळात ९४, तर वणी मंडळात १४ मिलिमीटर पाऊस झाला. कोचरगाव, सोनगाव, तिल्लोळी, विळवंडी येथील ६७ घरांचे अंशत: नुकसान झाले. ३७ शेतकऱ्यांचे कांदा, दोडका, बाजरी, काकडी, गहू, भोपळा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये एका हरितगृहासह १९ घरांचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे वीज पडून गायीचा मृत्यू झाला. सुरगाण्यातील हतगड येथे तीन घरांचे नुकसान झाले तर नऊ शेतकऱ्यांचा कांदा भिजला. कळवणच्या कनाशी मंडळात ३० घरांचे अंशत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता.