अर्भक मृत्यू दर कमी होण्यास मदत होणार चारुशीला कुलकर्णी, नाशिक आरोग्य विभागाकडून बाल मृत्यूवर नियंत्रणासाठी नवजात शिशुंकरिता सुरू करण्यात आलेला ‘होम बेस न्यु बॉर्न केअर’ (एचबीएनसी) कार्यक्रम लवकरच महापालिका हद्दीत सुरू होणार आहे. जिल्हा परिसरात वर्षांकाठी ४० हजारांहून अधिक नवजात शिशूंना या अंतर्गत आवश्यक उपचार तसेच आरोग्य सेवा मिळणार असल्याने अर्भक मृत्यूचा दर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. कुटुंबातील नवा सदस्य म्हणून ‘नवजात शिशू’ हा सर्वाच्या काळजीचा तसेच चर्चेचा केंद्रिबदू असला तरी योग्य त्या देखरेखीअभावी नवजात शिशूच्या पहिल्या काही दिवसांत त्याची वाढ खुंटते. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाने २०१२ मध्ये ‘होम बेस न्यु बॉर्न केअर’ हा उपक्रम आशा सेविकांच्या माध्यमातून हाती घेतला होता. नाशिकमधील पेठ, सुरगाणा, बागलाण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, नाशिकजवळील गिरणारे परिसर, इगतपुरी या ठिकाणी तीन हजार ५१६ आशा आणि २३० गट प्रवर्तकांच्या माध्यमातून काम सुरू आहे. शिशूचा जन्म रुग्णालयात झाला असेल, तर पहिल्या ४२ दिवसांत सहा गृहभेटी आणि शिशू घरीच जन्माला आले असेल तर सात गृहभेटी देण्यात येतात. यामध्ये स्तनदा मातेला बाळाला दूध कसे पाजायचे, बदलत्या ॠतुमानानुसार बाळाची काळजी कशी घ्यावी, त्याला घरातल्या घरात उबदार वातावरण कसे देता येईल, जंतुसंसर्ग कसा टाळता येईल, याची माहिती दिली जाते, असे जिल्हा समूह समन्वय अधिकारी शरद नागरे यांनी सांगितले. ‘आशां’ना प्रशिक्षण दिल्यामुळे आजारी बालकांवर घरच्या घरी उपचार होत आहेत. मात्र काम करताना पेठ आणि सुरगाणामध्ये बालकांची विशेष काळजी घ्यावी लागेल, हे लक्षात आल्यामुळे एसबीएनसीच्या धर्तीवर विशेष उपक्रम सुरू झाला आहे. यामध्ये शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांना एक दिवसाआड भेट दिली जाते. तसेच सहा महिने ते एक वर्षपर्यंत १५ दिवसांला गृह भेट देत त्यांच्या तब्येतील चढ-उताराची माहिती संकलित करत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे २५०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे बाळ असल्यास त्याला उपचारासाठी पुढे पाठविले जाते. या उपक्रमाची फलश्रुती पाहता लवकरच महापालिका हद्दीत हा उपक्रम सुरू होणार असल्याचे नागरे म्हणाले. ‘होम बेस न्यू बॉर्न केअर’ म्हणजे काय? नवजात शिशुला जंतु संसर्ग, बदलते ॠतुमान तसेच आवश्यक निगा न राखल्यास त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. राज्याच्या बालमृत्यूचा आकडेवारीचा विचार केला तर शून्य ते तीन वयोगट अर्थात पहिल्या एक हजार दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. विशेषत अर्भक मृत्यूचा दर हा १३ टक्के राहिला आहे. यामध्ये कमी वजनाचे बाळ, जंतुसंसर्ग, न्युमोनिया, कुपोषण आदी कारणांमुळे बालमृत्यू होतो. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘होम बेस न्यु बॉर्न केअर’ उपक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये आशा गृहभेटीतून नवजात शिशु आणि स्तनदा मातांना ४२ दिवसांपर्यंत आरोग्य सेवा देतात. यामध्ये बाळाला ‘कांगारू’ प्रमाणे आई किंवा घरातील अन्य व्यक्ती कशी सांभाळू शकते, त्याला घरातच उबदार वातावरण कसे मिळेल, बाळाला दूध कशा स्थितीत पाजावे, स्तनदा मातेचा आहार कसा असावा, बाळाचे लसीकरण आदींची माहिती देत त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्याच्या गृहभेटीत नोंदी ठेवण्यात येत आहेत. गरज भासल्यास औषधोपचारही देण्यात येत आहे.