शहरातील वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश जोशी यांना वैनतेय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जोशी यांच्या दुर्गभ्रमंतींच्या आठवणींना सर्वानी उजाळा दिला. रोटरी सभागृहात झालेल्या सोहळ्यात वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते जोशी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ दुर्ग इतिहास अभ्यासक तथा गड संवर्धन समितीचे सदस्य गिरीश टकले, गिर्यारोहक विजय कांबळे, राहुल सोनवणे उपस्थित होते. दळणवळणाची तोकडी साधने, प्लास्टिकचा कचरा नाही की गडबड गोंधळ करणारे माणसांचे अनियंत्रित लोंढे नाहीत, ‘ट्रेकिंग’ हा शब्दही फारसा माहिती नाही, अशा महाराष्ट्रातील दुर्गभ्रमंतीच्या सुवर्ण काळात आपल्या डोंगर यात्रांना प्रारंभ करून सह्य़ाद्रीतील गड, डोंगर, घाटवाटांच्या भटकंतीचे अर्धशतक पार करणाऱ्या जोशी यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. नव्या वाटांनी गडांना भेटी देणे, जवळपास सर्वच कठीण अशा गडांच्या शिखरांना गवसणी घालणे, डोंगरांवरच्या गुहा, मंदिरे किंवा उघडय़ावर मुक्काम करून तेथील शांतता अनुभवणे, निसर्गाच्या अद्भुत आणि राकट सौंदर्याचे दर्शन घेणे, नवनवे मित्र जुळवून सह्य़ाद्री नावाचा आनंद सोहळा साजरा करणाऱ्यांमध्ये जोशी यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यातील अनेक प्रसंगांना पाटील आणि टकले यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला. जोशी यांनी आपल्या संग्रहातील दुर्मीळ चित्रांच्या साहाय्याने आपल्या भटकंतीचा जीवन प्रवास कथन करताना काही गमतीशीर, गंभीर प्रसंगांना उजाळा दिला. प्रास्ताविक मनोज बाग, तर सूत्रसंचालन सुदर्शन कुलथे, श्यामा रुईकर यांनी केले. गार्गी परदेशी हिने जीवन कार्याविषयीच्या सादरीकरणाचे वाचन केले. अंबरीश मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोशी यांना अभिनंदनपर पाठविलेल्या पत्राचे यावेळी वाचन करण्यात आले.