जिल्ह्य़ात ८०० विहिरींची कामे अपूर्ण

नाशिक : ‘मग्रोरोहयो’ अंतर्गत मार्च २०१८ अखेर जिल्ह्य़ात १८९७ विहिरी अपूर्ण होत्या. विशेष मोहिमेंतर्गत ९१७ विहिरींची कामे करण्यात आली. तथापि, आजही ८०० पेक्षा अधिक विहिरींची कामे अपूर्ण आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील ६०० हून अधिक विहिरींची कामे दोन वर्षांहून अधिक काळापासून रखडलेली आहेत.

अनियमित, पुरेशा पावसाअभावी काही वर्षांत सातत्याने दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे. त्याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. यावर शाश्वत, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून सिंचन विहिरी बांधण्यास चालना दिली. किमान ०.६० हेक्टरहून अधिक जमीन नावावर असणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो. लाभार्थ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्टय़ा पात्र असणे आवश्यक असते. अर्जदाराने विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा तत्सम शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा असे अभिप्रेत आहे.  टंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेला कार्यक्रम नाशिक जिल्ह्य़ात रडतखडत सुरू असल्याचे अहवालावरून दिसून येते. यंदा जिल्ह्य़ातील सात तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. अन्य तालुक्यांतील काही भागात दुष्काळाची कमी-अधिक झळ बसत आहे. रखडलेल्या सिंचन विहिरींच्या कामामुळे योजनेचा मूळ उद्देश दूर राहिला आहे. दोन वर्षांहून अधिक काळापासून ६१५ विहिरींची कामे रखडलेली आहेत. ती आधीच पूर्णत्वास गेली असती तर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला असता. त्या विहिरीच्या परिसरात किमान पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. पण, तसे काही घडले नाही.

मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्य़ात १८९७ विहिरींची कामे अपूर्ण होती. ती पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली गेली. त्यासाठी १०८५ विहिरींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. या मोहिमेंतर्गत ९१७ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात पेठ, सिन्नर, चांदवड तालुक्यांना उद्दिष्टय़ानुसार विहिरींची कामे करता आलेली नाहीत. अन्य तालुक्यांच्या तुलनेत ते मागे पडले. आजही ८०० हून अधिक विहिरींची कामे अपूर्ण आहेत. कळवण ११८, पेठ १०९ आणि नांदगावमध्ये १०० विहिरींची कामे दोन वर्षांपासून रखडलेली आहेत.

पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक भागाला दुष्काळाचे चटके बसत असताना दुसरीकडे या स्थितीत तृषार्त परिसराला दिलासा देऊ शकणाऱ्या शेकडो सिंचन विहिरींची कामे अद्याप रखडलेली असल्याचे उघड झाले आहे.

दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या विहिरी

विहिरींची कामे संथपणे सुरू असल्याने दुष्काळात त्यांची मदत शेतकऱ्यांना होऊ शकणार नाही. दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ रखडलेल्या सिंचन विहिरींची संख्या ६१५ आहे. त्यात सर्वाधिक कामे (११८) कळवणमध्ये तर सर्वात कमी म्हणजे एक देवळा तालुक्यातील आहे. बागलाणमध्ये १९, चांदवड आठ, दिंडोरी सात, इगतपुरी १५, मालेगाव ८४, नांदगाव १००, नाशिक तीन, पेठ १०९, सिन्नर २२, सुरगाणा ७७, येवला ५० आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन विहिरींची कामे रेंगाळली आहेत.