नऊ स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगणार

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वक्तृत्व स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी गंगापूर रस्त्याजवळील प्रसाद मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता रंगणार आहे. महाअंतिम फेरीत पोहचलेल्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नऊ स्पर्धकांच्या वक्तृत्वकलेचा कस लागणार आहे.

कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांनी आपल्यातील वक्तृत्वविषयक गुणवत्तेचे दर्शन घडवल्यानंतर वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने विषयांची मांडणी करणारे नऊ स्पर्धक अंतिम फेरीत धडकले आहेत. त्यात निशिगंधा अभंग (आयुर्वेद सेवा संघ महाविद्यालय, पंचवटी, नाशिक), महिमा ठोंबरे (हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय, नाशिक), वृषाली राणे (अमृत वाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर), हर्षद औटे (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), सिद्धी देशपांडे (हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय, नाशिक), गायत्री वडघुले (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक), निशिता पेंढारकर (दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालय, एरंडोल), शुभम हिरे (भोसला सैनिकी महाविद्यालय, नाशिक), श्रुती देशमुख (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांचा समावेश आहे.

शुक्रवारी विभागीय अंतिम फेरीतून एका स्पर्धकाची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. मुंबई येथे १७ मार्च रोजी होणाऱ्या फेरीत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या स्पर्धकास मिळेल. महाविद्यालयीन स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*  कधी  – शुक्रवार, १ मार्च

*  कुठे – प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड

*  केव्हा – सायंकाळी साडेपाच वाजता

प्रायोजक

‘पिंताबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व’स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविवार, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.