नांदगाव शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुधारणा कामांसाठी २१ लाखांचा निधी वितरित करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या योजनेची एकूण किंमत ४६ लाख २७ हजार असून त्यास शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळणार आहे. त्यातील ५० टक्के हिस्सा शासनाने नगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान राबविले जात असून त्या अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या सर्वव्यापी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने नांदगाव शहर पाणीपुरवठा योजनेच्या ४७.६२ लाख रुपयांच्या सुधारणा कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

ग्राहक संरक्षण, जल लेखापरीक्षण, हायड्रोलिक मॉडेलिंग, जीआयएस मॅपिंग या कामांसाठी २५ लाख ३४ हजार, तर फ्लो मीटर पुरवठा, उभारणी व चाचणी या सुधारणा कामांसाठी १७ लाख ९० हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नांदगाव नगरपालिकेने स्वहिश्शाची चार लाख ७६ हजारांची रक्कम बँकेत जमा केली.

उर्वरित ९० टक्के म्हणजे जवळपास ४२ लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यातील ५० टक्के अर्थात २० लाख ८३ हजारांची रक्कम नगरपालिकेला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नांदगाव हा तसा दुष्काळी भाग. पिण्याच्या पाण्याची केवळ शहर नव्हे तर, ग्रामीण भागातही भ्रांत पडलेली असते. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम शासकीय निधीअभावी रेंगाळले होते. त्यास निधी मिळाल्याने त्यांचा श्रीगणेशा होऊ शकेल.