विभागात नाशिक जिल्हा आघाडीवर बारावी निकालात राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या नाशिक विभागीय मंडळाने दहावीच्या निकालात मात्र काहीसा वरचा अर्थात सहावा क्रमांक मिळविला. नाशिक विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल ८७.४२ टक्के लागला. जिल्हानिहाय विचार केल्यास उत्तीर्णतेत नाशिक आघाडीवर असून नंदुरबार पिछाडीवर आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा वर्चस्व राखले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ०.३४ टक्क्यांनी घसरला आहे. मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी सकाळपासून विद्यार्थी, पालक संगणकाकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेला एकूण दोन लाख ५४ विद्यार्थी बसले होते. त्यातील एक लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास नाशिक (८८.४७), धुळे (८७.५१), जळगाव (८८.०८), नंदुरबार (८०.७४) अशी टक्केवारी आहे. विभागात बसलेल्या एकूण मुलांपैकी ९५ हजार ८१ विद्यार्थी अर्थात ८५.१६ टक्के उत्तीर्ण झाले. मुलींचे हेच प्रमाण ७९८११ असून टक्केवारी ९०.२८ इतकी आहे. विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. विशेष प्रावीण्यप्राप्त ४९ हजार ७४१, प्रथम श्रेणीत ७५ हजार २२९, द्वितीय श्रेणी ४४ हजार २४५, तर पास श्रेणीत ५६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी शनिवारपासून अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह ९ ते १८ जून या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेसाठी वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा ९ ते २७ जुलै या कालावधीत, तर बारावीची लेखी परीक्षा ९ ते २९ जुलै या कालावधीत होणार आहे. विषयवार टक्केवारी मराठी प्रथम भाषा ९०.०९ मराठी द्वितीय / तृतीय भाषा ९७.५४ उर्दू प्रथम भाषा ९२.१६ हिंदी प्रथम भाषा ९०.४० हिंदी द्वितीय / तृतीय भाषा ९१.७० इंग्रजी प्रथम भाषा ९९.३३ इंग्रजी द्वितीय / तृतीय भाषा ८८.२५ गणित ८९.२५ विज्ञान ९६.११ सामाजिकशास्त्रे ९६.७६मूळ गुणपत्रिका कधी मिळणार? दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणत: आठ ते दहा दिवसांत मूळ गुणपत्रिका शाळांमार्फत विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात. ऑनलाइन निकाल जाहीर करताना ही तारीख जाहीर केली जाते. यंदा मात्र ती जाहीर करण्याचे टाळण्यात आले. यामुळे मूळ गुणपत्रिका कधी मिळणार याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे विचारणा केली असता ती तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात आले. ही तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कॉपीप्रकरणी ८७ विद्यार्थ्यांना शिक्षा दहावीच्या निकालात विभागात १३२ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. त्यापैकी ८७ विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. गैरमार्ग प्रकरणात नाशिक जिल्ह्य़ात १० जळगाव ४५, नंदुरबारच्या १२ तर धुळे जिल्ह्य़ातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.