* मीटर नोंदीनंतर दुसऱ्या दिवशीच देयक * ऑगस्टपासून वेळेवर देयके मिळणार नाशिक : वीजदेयक प्रणालीतील सावळ्यागोंधळावर मात करण्याबरोबर ग्राहकांच्या हाती प्रत्येक महिन्यात वेळच्या वेळी देयक देण्यासाठी महावितरण कंपनी एक ऑगस्टपासून शहरात नवीन केंद्रीभूत प्रणालीने काम सुरू करणार आहे. यामध्ये ज्या ग्राहकांच्या मीटरच्या नोंदी घेतल्या जातील, त्या ग्राहकांना लगेच नोंदीच्या दुसऱ्या दिवशी देयके पाठविली जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची आठवडय़ाची प्रतीक्षा आता संपणार आहे. ग्राहकांना प्रत्येक महिन्याला नियमित देयके पाठवून ते भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देणे वीज कंपनीला बंधनकारक आहे. परंतु, छायाचित्राच्या नोंदी घेणे, त्या संगणकीय प्रणालीत समाविष्ट करणे, छपाई आदी कामांना विलंब झाल्यास वीज देयक भरण्यासाठी द्यावा लागणारा कालावधी कमी होण्याचा धोका असतो. त्यातही या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास ग्राहकावर सरासरी देयकाचा बोजा पडतो. या सर्व घडामोडींचा फटका अखेर ग्राहकांना बसत असल्याने वीज देयक प्रणालीत सुधारणा करण्याच्या दिशेने महावितरणने पाऊल टाकले आहे. शहरात महावितरणचे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक असे सर्व मिळून एकूण एक लाख ९५ हजार ग्राहक आहेत. त्यांच्या देयकांमार्फत वीज कंपनीला महिन्याला ३५ कोटींचे उत्पन्न मिळते. सुमारे दोन लाख ग्राहकांची प्रत्येक महिन्याला वेळेत देयके देण्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत. प्रत्येक ग्राहकाच्या मीटरवरील नोंदीचे छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. हे काम १० ते १२ खासगी संस्थांमार्फत केले जाते. एका उपविभागातील दहा हजार मीटरच्या नोंदी पूर्ण झाल्यावर तेथील देयकांवरील प्रक्रिया सुरू होते. हा टप्पा गाठेपर्यंत देयके पाठविता येत नव्हती. नव्या व्यवस्थेने ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. देयकांमधील सावळागोंधळ वीज मीटर नोंद घेताना काही वेळा ते योग्य पद्धतीने न घेणे, अस्पष्ट असणे अशा त्रुटी असतात. संगणकीय यंत्रणेत नोंदी समाविष्ट करताना अधिक्याने चुका होतात. कधीकधी नोंदी घेणारी खासगी संस्था घर बंद होते वा तत्सम शेरे मारून महावितरणला माहिती देते. परिणामी, ग्राहकांवर सरासरी देयकाचा भुर्दंड पडतो. मुळात वीज कंपनीला एकापेक्षा अधिकवेळा सरासरी देयक देता येत नाही. देयक भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मिळणे बंधनकारक असते. महावितरणने वीज देयक वितरण प्रणालीची मानक कार्यपध्दती, सरासरी देयकांबाबत काय कार्यवाही करावी, याबद्दल अनेक परिपत्रक काढले आहे. त्यांचे पालन होत नाही. अनेकदा सरासरी देयके ग्राहकांच्या माथी मारली जातात. ग्राहक तक्रार करायला गेले की आधी पैसे भरा मग कार्यवाही होईल असे सांगितले जाते. संपूर्ण राज्यात असा गोंधळ असून याबद्दल वारंवार वीज कंपनीला जाणीव करून देण्यात आली आहे. -अॅड. सिद्धार्थ सोनी, सचिव, वीज ग्राहक समिती ग्राहकाला वीज देयक देण्यास विलंब होऊ नये म्हणून शहरात एक ऑगस्टपासून केंद्रीभूत नवीन प्रणाली कार्यान्वित होत आहे. त्यामुळे मीटरची नोंद घेतल्यानंतर देयक तयार होईपर्यंत लागणारा पाच ते सहा दिवसांचा कालावधी संपुष्टात येईल. दररोज जितक्या मीटरची नोंद घेतली जाईल, तितक्या मीटरची देयके लगेच दुसऱ्या दिवशी ग्राहकाला खासगी टपाल सेवेने पाठविली जातील. सध्या देयके देताना होणारा विलंब नवीन व्यवस्थेने संपुष्टात येणार आहे. -पी. आर. ब्राह्मणे, उपव्यवस्थापक, नाशिक शहर