पाणी टंचाईच्या संकटामुळे शहरी भागात कोरडी रंगपंचमी खेळण्याची गरज व्यक्त होत असताना ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नसल्याने हा सण साजरा होणार नसल्याची स्थिती आहे. टंचाईचे संकट लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या रहाडी यंदा न खोदले जाण्याची शक्यता कमी आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी यंदा टंचाईमुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. होळी व रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात पाणी टंचाईचे तीव्र संकट भेडसावत असताना रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळून हा उत्सव साजरा व्हावा, यादृष्टीने राजकीय पक्ष, पोलीस यंत्रणा आणि विविध संघटनांनी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. शहरातील जुन्या नाशिक परिसरात जमिनीत विहिरीसारख्या असणाऱ्या रहाडींमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्याकरिता मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. रहाडीत रंगपंचमी साजरी केल्यास पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक मंडळ यंदा कोरडी रंगपंचमी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी रेन डान्स वा तत्सम प्रकारांना फाटा देण्याची मानसिकता ठेवण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी देखील दुष्काळी परिस्थितीत रंगपंचमी पाण्याचा अपव्यय न करता साजरी करावी, अशी भूमिका घेण्याची गरज आहे. बिनपाण्याच्या रंगपंचमीवर मतैक्य झाल्यास त्यास सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. नाशिक शहरात पाणी कपात लागू आहे. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयीन युवक व नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता सण साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. गंगापूर धरणातील पाणी पातळी खालावली आहे. आगामी काही दिवसात पाण्याची बचत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करताना पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन केले आहे.

सामन्यांचे रंग फिके..
ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे रंगपंचमी साजरी होईल, अशी स्थिती नाही. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मारामार असताना रंगपंचमीसाठी पाणी कुठून आणणार, हा प्रश्न आहे. येवला शहरात दरवर्षी रंगाचे सामने रंगत असतात. यंदा हे सामने न खेळले जाण्याची शक्यता आहे.