बाल स्वास्थ्य कार्यक्रम तपासणी

यंदा जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत ‘नैराश्य झटकू या’ या संकल्पनेला मूर्त रूप देत मानसिक आजारांविषयी प्रबोधनावर भर देण्यात येत आहे. मात्र मानसिक आजाराचे मूळ असलेली बाल्यावस्था दुर्लक्षित राहते. ग्रामीण भागात दोन हजाराहून अधिक बालकांची तपासणी केल्यानंतर त्यातील ८५३ बालकांना मानसिक आजार असल्याचे समोर आले.

असांसर्गिक असलेल्या मानसिक आजाराविषयी समाजात कमालीची अनास्था, गैरसमजुती आहेत. दैनंदिन वर्गात एखादा मुलाचा बुद्धय़ांक कमी असला किंवा दिसण्यावरूनही त्याच्यावर ‘मंद’ हा शिक्का मारला जातो.  त्यांना गतिमंद मुलांच्या शाळेत नेण्यासाठी दबाव टाकला जातो. शहरी भागात पालक काहीसे जागरूक असल्याने पूर्व प्राथमिक गटात बालकांसाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत ते कामास सुवात करतात. मात्र ग्रामीण भागात विदारक परिस्थिती आहे.

या पाश्र्वभूमीवर, येथील जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक रुग्ण विभागातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून या दुर्लक्षित बालकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत  जिल्हा रुग्णालयाचा मानसिक रुग्ण विभाग जिल्ह्यातील इगतपुरी, येवला, कळवण, पेठ, निफाड, सटाणा, घोटी, त्र्यंबक आणि हरसुल येथे सोमवार व शुक्रवारी तपासणी करत आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाद्वारे फिरते वैद्यकीय पथक अंगणवाडी, बालवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करतांना त्यांना अशी काही विशेष बालके आढळली तर त्याबाबत संबंधित विभागाकडे जाण्याची सूचना करते. यामुळे जिल्हा रुग्णालयात महिन्याकाठी ७० ते ८० बालके केवळ तपासणी किंवा शंकाचे समाधान करण्यासाठी येत आहे. या बालकांची नियमित तपासणी करतांना प्रथम बुध्यांक तपासणी केली जाते. यामुळे तो गतिमंद आहे की मतिमंद हे समजण्यास मदत होते. दुसरे म्हणजे तो सर्वसामान्य बालक आहे, मात्र घरातील ताण तणाव, घरगुती हिंसा किंवा अन्य काही कारणांस्तव तो सध्या अध्ययन अक्षम आहे हे तपासता येते. यातील कोणत्या वर्गात तो येतो यावर त्याचे पुढील उपचार अवलंबून आहेत.

मागील वर्षी या तपासणीतून ८५३ विद्यार्थ्यांना बुद्धी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले असून पुढील विशेष उपचारासाठी त्यांना मुंबईत पाठविण्यात आले. दुसरीकडे १००० मुलांची बुध्यांक तपासणी झाल्याने त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सोपे झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुलांशी किमान संवाद साधा.

आपले पाल्य सर्वसामान्य मुलासारखे आहे की विशेष हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. केवळ शाळा किंवा समाज म्हणतो यापेक्षा त्याच्याशी मोकळेपणाने बोला. त्याला साधे साधे प्रश्न विचारत बोलते करा. त्याला तुमच्याविषयी विश्वास वाटू द्या. यातून आपल्या बाळाची खरी ओळख होईल. आपले बाळ विशेष असेल तर आहे तसे त्याला स्विकारत त्याचे मानसिक आरोग्य चांगले कसे राहील याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. गेल्या काही वर्षांत पालकांमध्ये याविषयी सजगता आली असून ग्रामीण भागात आता कुठे हा विचार रुजण्यास सुरुवात झाली आहे.

डॉ. नीलेश जेजुरकर (मानसिक रुग्ण विभाग, जिल्हा रुग्णालय)