जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ६० हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असतांना त्यातील ४८ हजार १२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे आतापर्यंत ११२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्थितीचा त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हा व्हॅलीच्या सभागृहात बैठक घेऊन आढावा घेतला. इगतपुरीपेक्षा त्र्यंबकेश्वर ताालुक्याचा मृत्यूदूर अधिक आहे. तो कमी करण्यावर आरोग्य व्यवस्थेने लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सूचित केले.

जिल्ह्याच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याची जिल्ह्याची टक्केवारी ८०.७६ आहे. यात नाशिक शहरात ८३.५१, नाशिक ग्रामीणमध्ये ७४.०६, मालेगाव शहरात ७८.८९ टक्के तर जिल्हाबा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७०.२४ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ३४२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६२१ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३७ आणि जिल्ह्याबाहेरील २६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक सहा हजार ९७ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ५५७ रुग्ण उपचार घेत आहेत.

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात करोनाचे तीन हजार ६०८ रुग्ण उपचार घेत आहेत. यात  नाशिक तालुक्यात ४३८, चांदवड १९०, सिन्नर ३९९, दिंडोरी १६०, निफाड  ८९१, देवळा ९४,  नांदगांव ३८४, येवला ११५, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा २२, पेठ १५, कळवण ७५,  बागलाण ३०१, इगतपुरी १७६, मालेगांव ग्रामीण ३१२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ७४ रुग्ण स्थानिक पातळीवर उपचार घेत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्थितीची भुजबळ यांनी माहिती घेतली. त्र्यंबकेश्वरचा मृत्यूदर इगतपुरीपेक्षा अधिक  म्हणजे २.४१ टक्के आहे. संशयित रुग्णांना लवकर शोधून तातडीने उपचार सुरू होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आ. हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैंदाणे आदी उपस्थित होते.