केटीएचएम महाविद्यालयाकडे सांघिक करंडक

सला सैनिकी महाविद्यालयातील मुग्धा जोशी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने येथे आयोजित १० व्या अखिल भारतीय मविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेत विजेती ठरली. एकूण ९६ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मुग्धाने ‘स्मार्ट सिटीज – वास्तव की आभास’ या विषयावर विचार मांडले. तिला २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मविप्र सांघिक करंडक मात्र केटीएचएम महाविद्यालयाने राखला. श्वेता भामरे व हर्षांली घुले यांनी करंडक स्वीकारला.

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचा प्रशांत ठाकरे व्दितीय, तर केटीएचएम महाविद्यालयाची श्वेता भामरेने तृतीय क्रमांक मिळविला.  विक्रांत सिंग (सेंट जॉर्ज महाविद्यालय, आग्रा), हर्षांली घुले (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक), चीत्ततोष खांडेकर (टिळक महाविद्यालय, धुणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण सोहळा मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक मुरलीधर पाटील, भाऊसाहेब खातळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नीलिमा पवार यांनी स्पर्धेचा मुख्य उद्देश देशासाठी चांगले नेतृत्व तयार करणे हा असल्याचे नमूद केले. पुढील वर्षांपासून भाषेनुसार पारितोषिक देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षक प्रा. सतीश श्रीवास्तव यांनी  बोलण्याकरिता धैर्य गरजेचे असून वक्तृत्वात सहजता व संवाद असावा असे मत मांडले. आग्रा येथील सेंट जॉर्ज महाविद्यालयातील विक्रांत सिंग आणि औरंगाबाद येथील सोनू शेरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात स्पर्धा कार्याध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांनी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषय समकालीन संदर्भ असलेले व समाजाच्या आस्थेचे असल्याने स्पर्धकांना चांगले मुद्दे मांडल्याची संधी मिळाल्याचा उल्लेख केला. सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख डॉ. डी. पी. पवार यांनी केले. आभार डॉ. अशोक पिंगळे यांनी मानले. यावेळी प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त स्पर्धकांनी आपले विषय मांडले.