पालक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुक्ती महोत्सव उपक्र माचे कौतुक

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका. हा बाबासाहेबांचा विचार संदेशच जणू मुक्ती महोत्सवाच्या निमित्ताने पाळला गेला, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाईन संदेशातून मांडले.

करोना संसर्ग काळात सर्व नियमांचे पालन करत मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२० युटय़ूब चॅनलच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. महामानव डा.ॅ बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे आयोजित ‘मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत‘ केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन मुक्ती महोत्सव—२०२० साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे पालकमंत्री भुजबळ यांनी कौतुक केले. महोत्सवाचे उदघाटन कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष बुरंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी येवल्याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघ होते. महोत्सवाव्दारे व्याख्याने, परिसंवाद, वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमातून लोक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धर्मांतरित बौद्ध आणि भारताची जनगणना २०२१ या विषयावरील व्याख्यान्त वक्ते अ‍ॅड. अनिल वैद्य यांनी धर्मांतरित बौद्धांनी आपले प्रश्न नीट समजून घेऊन सांघिक लढा उभारण्याचे आवाहन के ले. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गायकवाड होते. प्रास्ताविक शरद शेजवळ, सूत्रसंचालन मिलिंद पगारे यांनी केले. धम्म आणि संविधान चळवळ महिलांनी हाती घ्यावी या विषयावर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी मार्गदर्शन केले. मानवी जीवनात शिलाचरणाशिवाय उन्नती होत नाही. उद्याच्या शीलवान समाजासाठी युवती तथा महिलांनी धम्म आणि संविधान चळवळ हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.सुवर्णा पगारे होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची समाज माध्यमे या विषयावर पत्रकार सुधीर लंके यांचे व्याख्यान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकार जीवनात समता, मूकनायक, प्रबुद्ध भारत, जनता या पाक्षिकातून पत्रकारिता धर्म आचरण कसे असावे याचे आदर्श घालून दिले असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार कुमार कांबळे हे होते. ऑनलाईन मुक्ती महोत्सवाचा समारोप आंबेडकरवादी गझल संमेलनाने झाला. ज्येष्ठी गझलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. आंबेडकरवादी गझलकार  सुनील ओवाळ (मुंबई), सूर्यकांत मुनघाटे (नागपूर), अण्णा त्रिभुवन (वाशी), सचिन साताळकर (येवला), अत्ताम गेंदे (परभणी), प्रीती जमधडे (चिमूर), छाया सोनवणे (जळगांव), संदीप वाकोडे (अकोला) यांनी आपल्या गझला सादर केल्या. मुक्ती महोत्सवाचे प्रवर्तक तथा निमंत्रक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन के ले. आभार मिलिंद गुंजाळ यांनी मानले.