नाशिक महापालिकेतील कामाच्या तणावामुळे आपण जीवनयात्रा संपवत असल्याची चिठ्ठी लिहीत बेपत्ता झालेले पालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवी पाटील हे अखेर घरी परतले आहेत. रवी पाटील यांच्या या चिठ्ठीमुळे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते. नाशिक महापालिकेतील सहाय्यक अभियंता रवी पाटील हे गेल्या आठवड्यात शनिवारपासून बेपत्ता झाले होते. शनिवारी महापालिकेतर्फे 'वॉक विथ कमिश्नर' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नाशिकरोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास जात असल्याचे सांगून पाटील हे सकाळी घराबाहेर पडले. पाटील हे डिसूजा कॉलनीत राहतात. त्यांनी इमारतीखाली पार्क केलेल्या कारमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकारानंतर महापालिकेतील अभियंते पोलीस ठाण्यात जमले होते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाई आणि निलंबनाच्या धास्तीमुळे अनेक जण तणावाखाली असल्याची चर्चाही सुरु झाली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरु केला होता. अखेर शुक्रवारी सकाळी पाटील हे त्यांच्या घरी परतले आहेत. ते नेमके कुठे होते, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. ग्रीन फिल्ड लॉन्सवरील कारवाईचे कनेक्शन? पाटील यांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रीन फिल्ड लॉन्सवर पालिकेने केलेल्या कारवाईशी संबंध असू शकतो, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पालिका पथकाने गोदाकाठावरील लॉन्सची संरक्षण भिंत पाडली होती. उच्च न्यायालयाने भिंत पाडण्यासाठी स्थगिती दिली होती. मात्र, याच काळात भिंत पाडण्यात आली आणि त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंडे यांना हायकोर्टात माफी मागावी लागली. या घटनाक्रमाने पाटील हे तणावाखाली होती, वरिष्ठांकडून कारवाई होईल, अशी धास्ती त्यांना वाटत होती, अशी चर्चा आहे