जिल्ह्य़ात ८८ कोटींची १२ गोदामांची उभारणी; ‘पॉज’मुळे बेकायदा उचलेगिरीला चाप

धान्य साठवण्यासाठी जिल्ह्य़ात गोदामांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी ८८ कोटी १६ लाख रुपये खर्चून १२ गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्य़ाची सध्याची १३ हजार मेट्रिक टन अन्नधान्य साठविण्याची क्षमता ३४ हजार मेट्रिक टन होईल. पॉज यंत्रामुळे धान्य वाटपात आमूलाग्र सुधारणा झाली आहे. यंत्रात अंगठय़ाचा ठसा घेऊन वितरण होत असल्याने बेकायदा उचल थांबल्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

शक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या बापट यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. दुपारी शासकीय विश्रामगृहात अन्न औषधांसंबंधीच्या प्रकरणांची सुनावणी झाली. नंतर जिल्ह्य़ातील सर्व आमदारांशी संवाद साधून धान्य वितरण प्रणालीतील तक्रारी जाणून घेतल्या. स्वस्त धान्य दुकानातून १४ रुपये प्रति किलो दराने फोर्टिफाइड मीठ वितरणाचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना धान्य वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

राज्यात एकूण ५५ हजार ३६० शिधावाटप दुकानदार आहेत. त्यातील ९८ टक्के दुकानांमध्ये पॉज यंत्रणा बसविली गेली आहे. काही अपवादात्मक भागात तांत्रिक संपर्क यंत्रणा नसल्याने त्या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीने धान्य दिले जाते. आधुनिक प्रणालीद्वारे १० लाख बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. ३८५० मेट्रिक टन धान्याची बचत झाली. घासलेट उचलण्याचे प्रमाण निम्म्याहून अधिकने कमी झाले. धान्य खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर दिले गेले. धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम पूर्णत्वास नेले जाईल. गोदामांसाठी १२ ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली असून त्यांच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

चार हजार अन्न, औषध प्रकरणाचा निपटारा

नागरिकांना स्वच्छ अन्नपदार्थ मिळावे म्हणून अन्न, औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. मध्यंतरी राज्यात ३५० ठिकाणी छापे टाकले गेले. त्यातील १४३ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. दोन वर्षांत अन्न औषध विभागासंबंधीच्या चार हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात अन्नधान्याची स्थिती बिकट असून काही आयात करावे लागणार असल्याचे संकेत दिले.

अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

मालेगावसह इतर भागांत विशिष्ट प्रकारच्या अमली पदार्थाची विक्री केली जाते. अमली पदार्थाच्या विक्रीमुळे युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याची तक्रार एका आमदाराने बैठकीत केली होती. त्यावर उपस्थित झालेल्या प्रश्नावर बापट यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नमूद केले.