हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. "या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे", असे भुजबळ यांनी म्हटले आहे. नागरिकांनी घरात प्रथोमोपचार किट, लागणारी आवश्यक औषधे व आजारी रुग्णाची औषधे सुरक्षित जवळ ठेवावी. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटरसाठी इंधनाचा पुरवठा असावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विनाकारण घराबाहेर न पडता व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विलगीकरणात असलेले नागरीक यांच्यासाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षीतस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे तसेच अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.