अनिकेत साठे

शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस मशागतीमागे लागतो. पावसाची चाहूल लागली की, त्याला ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही. चांगले उत्पादन हवे, तर पूर्वतयारी महत्त्वाची ठरते. शेती काय अन् राजकारण काय, दोन्ही ठिकाणी तोच निकष लागू होतो. याचा अनुभव असलेले शरद पवार यांचा नाशिक दौरा अशाच निवडणूकपूर्व मशागतीचे दर्शन घडविणारा ठरला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या मार्गावर आहे. तत्पूर्वीच, पवार यांनी तीन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकला. विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. पक्षाच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. लोकसभेसाठी सक्षम उमेदवाराची चाचपणीही केली. शेतकरी कर्जमाफी, कृषिमालाचे भाव ते एचएएल कारखान्यापर्यंतच्या प्रश्नांना हात घालत राष्ट्रवादीची उसवलेली वीण पुन्हा घट्ट करण्याकडे लक्ष केंद्रित केले.

शरद पवार आणि नाशिक यांचे अतिशय जुने अन् निकटचे नाते. पुलोदच्या काळात याच जिल्ह्य़ाने त्यांना भरभक्कम पाठबळ दिले होते. हे नाते दृढ होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे, नाशिकची कृषी उत्पादन क्षमता. नात्याची वीण कालांतराने उसवत गेली. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्य़ातील दोनपैकी एकही जागा मिळवता आली नाही. मोदी लाटेत छगन भुजबळांसारखे खंदे मोहरे गारद झाले. गेल्यावेळचे वातावरण आणि सध्याची परिस्थिती यात बरेच अंतर पडल्याचा अनुमान काढून पवार हे पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारीला लागल्याचे दौऱ्यात पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचा खुंटा मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर आधीपासून भुजबळ समर्थक आणि विरोधक असे गट आहेत. त्यास मराठा-ओबीसी वादाची किनार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ हे कारागृहात असतांना राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर पडले होते. जामीन मिळाल्यानंतर भुजबळांनी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीची सर्व सूत्रे पुन्हा हाती घेतली. भुजबळ कुटुंबातून कोणालातरी निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू केली. मराठा समाजातून काही इच्छुक आहेत. उमेदवारीचा मुद्दा पक्षांतर्गत वादाचे कारण बनणार नाही, याची दक्षता पवार यांनी घेतली आहे.

आजवरच्या दौऱ्यात पवार हे कधीही भुजबळ फार्मवर गेले नव्हते. यावेळी त्यांनी तिथे आवर्जून भेट दिली. भुजबळांची पाठराखण केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक घेतली. भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत भाजप नेत्यांकडून वापरली जाणारी भाषा सुसंस्कृतपणाचे लक्षण नसल्याचे सांगितले. जिल्ह्य़ात लोकसभेचे नाशिक आणि दिंडोरी हे दोन मतदार संघ आहेत. आघाडीतील जागावाटपात या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. त्यातील दिंडोरीवर माकपने हक्क सांगितला आहे. ही जागा राष्ट्रवादी माकपला देण्याची शक्यता कमी आहे. दिंडोरी मतदार संघातील चांदवड येथे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संवाद मेळाव्यातून तेच अधोरेखित करण्यात आले. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचालित लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या इमारतीचे उद्घाटन आणि गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा अनावरण सोहळा शरद पवार, महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. तेव्हा पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. सामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले.

जम्मू-काश्मीर येथे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले वैमानिक निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे पवार हे साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमांतही रमले. शेतकऱ्यांना काँग्रेसने दिलेली कर्जमाफी आणि भाजपने दिलेली कर्जमाफी यातील फरक असो की सैनिकांच्या शौर्याचे भाजपकडून चाललेले राजकारण असो. इतकेच नव्हे तर, कृषिमालास मिळणारा अल्प भाव, चुकीच्या धोरणामुळे विस्कटलेले शेतीचे गणित आदी मुद्यांवरून त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. राफेलच्या मुद्यावरून एचएएल कारखान्याचे काम हिरावून नेल्याची टिप्पणी करीत स्थानिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.